लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाबाबत प्रशासनाची अनास्था अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. राष्ट्रसंतांच्या नावाने सुरू असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाचे अनुदान मिळणे शक्य आहे. यासाठी आयोगाची मान्यता आवश्यक आहे. मात्र त्यासाठी विद्यापीठाकडून अद्यापही पुढाकार घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पदव्युत्तर पदवीनंतर तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर संशोधन करणे शक्य होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे.
तुकडोजी महाराजांच्या अनुयायांच्या अथक प्रयत्नांनी अध्यासन सुरू तर झाले. मात्र सुरुवातीपासूनच अध्यासनाबाबत विद्यापीठाने हवा तसा पुढाकार घेतला नाही. अनुयायांनी वारंवार प्रयत्न केल्यानंतर अखेर या अध्यासनाबाबत प्रचार-प्रसार करण्यात आला व मग विद्यार्थी मिळण्यास सुरुवात झाली. या विभागात सुरू असलेला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम हा रोजगाराभिमुख नाही. त्यामुळे याकडे तरुणांची पावले वळत नाही. राष्ट्रसंतांच्या विचारांची देशाला व समाजाला आवश्यकता आहे. याकडे तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात यावे व त्यांचे विचार आत्मसात करावे, या उद्देशातून येथे संशोधनाचीदेखील आवश्यकता आहे. परंतु अध्यासनातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला विद्यापीठ अ़नुदान आयोगाची मान्यता नाही. यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यासमंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर रक्षक व इतरांनी २०१८ साली विद्यापीठाला निवेदन दिले होते. त्यानंतर वारंवार यासंदर्भात विद्यापीठाला आठवण करून देण्यात आली. मात्र विद्यापीठाने ना पुढाकार घेतला ना प्रस्ताव तयार करण्याची तसदी घेतली. विद्यापीठाला ‘नॅक’चा अ दर्जा मिळाला आहे. आता कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी स्वत: पावले उचलावी व राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा एम.ए. अभ्यासक्रमाला यूजीसीची मान्यता मिळवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावी, अशी मागणी रक्षक यांनी केली आहे.