लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘एफसीआय’च्या (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) गोदामात जागा नसल्याने बाहेर ठेवलेल्या धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. मात्र गोदामात ठेवण्यात आलेले धान्यदेखील चांगले राहीलच याची शाश्वती नाही. ‘एफसीआय’च्या आकडेवारीतूनच ही बाब समोर आली आहे. २०१५-१६ पासून ५८ महिन्यांत २५ कोटींहून अधिक किमतीचे गहू-तांदूळ खराब झाले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘एफसीआय’कडे विचारणा केली होती. २०१५-१६ ते जानेवारी २०२० या कालावधीत ‘एफसीआय’तर्फे देशभरात किती धान्य साठविण्यात आले, किती धान्य खराब झाले व उंदीर- घुशींमुळे किती धान्य खराब झाले, यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. ‘एफसीआय’कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २०१५-१६ ते जानेवारी २०२० या कालावधीत ०.२१६ एलएमटी (लाख मेट्रिक टन) गहू-तांदूळ खराब झाले. यात ०.०९८ एलएमटी गहू व ०.११८ एलएमटी तांदळाचा समावेश होता.खराब झालेल्या गहू-तांदळाची किंमत ही २५ कोटी १२ लाख इतकी होती. यात ९ कोटी २४ लाख रुपयांचे गहू व १५ कोटी ८८ लाखांच्या तांदळाचा समावेश होता.सर्वाधिक नुकसान २०१६-१७ मध्ये२०१६-१७ मध्ये सर्वाधिक धान्य खराब झाले. त्या एका वर्षात ०.०९ एलएमटी गहू तांदूळ खराब झाले व त्याची किंमत ९ कोटी १२ लाख इतकी होती. २०१८-१९ मध्ये ६ कोटी ७३ लाख तर २०१९-२० मधील पहिल्या १० महिन्यातच २ कोटी ६१ लाखांचे गहू-तांदूळ खराब झाले.उंदरांमुळे काहीच नुकसान नाहीसाधारणत: उंदरांमुळे अनेकदा धान्य खराब होत असल्याची ओरड होते. परंतु ‘एफसीआय’मध्ये उंदरांमुळे काहीच नुकसान झाले नसल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. ‘एफसीआय’कडून वैज्ञानिकरीत्या धान्य साठविण्यात येते. नियमितपणे ‘पेस्ट कंट्रोल’देखील होते. त्यामुळे उंदरांमुळे कुठलेही धान्य खराब झाले नाही, असे माहिती अधिकारात सांगण्यात आले नाही. जर उंदरांमुळे धान्य खराब झाले नाही, तर २५ कोटींचे गहू-तांदूळ कशामुळे खराब झाले, हा प्रश्नच आहे.
उपराजधानीत ५८ महिन्यात २५ कोटींचे गहू-तांदूळ खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 11:27 IST
उपराजधानीत २०१५-१६ ते जानेवारी २०२० या कालावधीत ०.२१६ एलएमटी (लाख मेट्रिक टन) गहू-तांदूळ खराब झाले. यात ०.०९८ एलएमटी गहू व ०.११८ एलएमटी तांदळाचा समावेश होता.
उपराजधानीत ५८ महिन्यात २५ कोटींचे गहू-तांदूळ खराब
ठळक मुद्दे‘एफसीआय’चे वास्तव नासाडीचा आकडा नेमका किती?