लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील समता प्रतिष्ठानच्या कामाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल आणि यात प्रथमदर्शनी दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात केली. परंतु याचसंदर्भात आपण पाच वर्षांपूर्वी तक्रार केली होती. त्यावर चौकशीही झाली. त्या चौकशीचे पुढे काय झाले? असा प्रश्न संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच चौकशीनंतर कारवाई करताना निर्णय घेणाऱ्यांवर व्हावी, कारण खालचे अधिकारी हे आऊट सोर्सिंगद्वारे भरले आहेत. त्यांनी निर्णय घेतलेले नाहीत. निर्णय प्रक्रियेत ज्यांचा सहभाग होता, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
खोब्रागडे यांनी म्हटले आहे की, २६ नोव्हेंबर २०१५ ला नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला. तीन-चार तासाच्या कार्यक्रमावर १ कोटी ८८ लाख रुपयांचा खर्च झाला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांवर वारेमाप खर्च झाला. अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला अशी तक्रार मी स्वतः २०१६ मध्ये सचिव सामाजिक न्याय आणि मुख्य सचिव यांचेकडे केली होती. मुख्य सचिव यांच्या निर्देशानुसार, सचिव सामाजिक न्याय यांनी आयुक्त समाजकल्याण यांना चौकशी करायला सांगितले. परंतु पुढे त्या चौकशीचे काय झाले ते अजूनही समजले नाही. बार्टी, समता प्रतिष्ठानच्या कारभाराची चौकशी हाही मुद्दा अनेकदा मांडला. परंतु त्याचे पुढे काहीच झाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.