सोनी टीव्हीच्या कलावंतांचा लोकमत सखी मंचच्या सदस्यांशी संवादविहंग सालगट - नागपूरबालिका वधू मालिकेतून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या प्रत्युशा बॅनर्जी आणि टीव्ही कलावंत दीप ढल्लन यांचा पुत्र कंवर ढिल्लन सोनी वाहिनीवरील ‘हम है ना..’ मालिकेच्या प्रमोशनसाठी लोकमत सखी मंचच्या संक्रांती मेळाव्यात आले. याप्रसंगी त्यांनी सखींशी संवाद साधला आणि आपले अनुभव सांगितले. याप्रसंगी त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा काही अंश वाचकांसाठी बालिका वधूने मिळाली ओळख बालिका वधू, झलक दिखला जा, बिग बॉस आणि नंतर सावधान इंडिया या मालिकेत प्रत्युशाने भूमिका केल्या आहेत. पण बालिका वधू या मालिकेतूनच माझी ओळख निर्माण झाली, असे प्रत्युशाने सांगितले. त्यामुळे ही भूमिकाच मला जास्त आवडते. यातील आनंदीची भूमिका माझ्या कायम स्मरणात राहील. प्रत्येक मालिकेचा अनुभव वेगवेगळा असतो. बिग बॉस मध्ये काम करताना बरेच शिकायला मिळाले. झलक दिखला जाटचा अनुभव वेगळा आहे. येथे वेगवेगळे नृत्य प्रकार शिकता आले. मी जरा नाजूक असल्याने बरेचदा नृत्य करताना जखमही झाली. बालिका वधू आणि झलक दिखला जा एकाचवेळी करीत होती त्यावेळी मला डेंग्यू झाला होता. त्यात वेळ काढणे माझ्यासाठी कठीण होते पण मला ते करता आले. सावधान इंडियात निवेदन करताना अनेक सत्य घटना समजून घेता आल्या. बालिका वधूला रिप्लेस केले तेव्हा माझ्या मनात जरा भीती होतीच पण लोकांनी मला स्वीकारले. ‘हम है ना..’ मालिका माझ्यासाठी लहान मुलीसारखी आहे. ही कथा बनारसला घडणारी आहे. ही मालिका लोकांना नक्की आवडेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. मी मुळात जमशेदपूरची राहणारी आहे. दहावीत असताना मुंबईत जाऊन अभिनय करण्याची इच्छा झाली. पण पालकांनी मला कोलकात्याला जाण्यास सांगितले. कोलकात्यात माझे मन रमले नाही आणि मी मुंबईत आले. त्यावेळी माझे वयही कमी होते. त्यावेळी आई म्हणाली, सर्वांच्या विरोधात तू मुंबईत जात आहेस तर काहीतरी बनून दाखव. आता तोच प्रवास सुरू आहे, असे प्रत्युशाने सांगितले. सिनेमात काम करण्याचे माझे स्वप्न : कंवर ढिल्लन‘हम है ना..’ची कथा बनारस येथे घडणारी आहे. यातला बंटी हा सर्वांचाच आवडता आणि गरीब कुटुंबातला आहे. एक बंगाली मुलगी लंडनमधून बनारसला येते आणि बंटीशी तिची भेट होते. दोघांमध्ये प्रेम निर्माण होते. पण बंटीची आई तिला स्वीकारत नाही. आई, चांगला पती आणि मुलगा यांच्या संघर्षाची ही कथा आहे, असे कंवर म्हणाला. मुंबईत मी पदवीचे शिक्षण घेत असताना प्रथम शिक्षण पूर्ण करण्याचाच माझा विचार होता. पण संधी आपली वाट पाहात नाही. वयाच्या १८ व्या वर्षीच एका मालिकेसाठी आमंत्रण आले आणि मालिकेत काम करताना मी अभ्यासही सुरु ठेवला. माझा भाऊ कॅनडात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तो आता परत येणार आहे. पण मुंबई सोडून जाण्याची माझी इच्छा नाही कारण येथेच मला माझे भविष्य दिसते आहे. वडिलांनी प्रथम शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता त्यानंतर काय वाट्टेल ते कर, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता मला जे करायचे ते करणार आहे. घरातून मला प्रत्येक बाबीसाठी प्रोत्साहनच मिळाले. आता काही मालिकांमध्ये काम करतो आहे पण भविष्यात मला सिनेमात काम करण्याची इच्छा आहे. मी स्पष्टवक्ता आहे त्यामुळे बरेचदा लोक दुखावले जातात पण बेगडी जगणे मला आवडत नाही.
हम हैं ना..
By admin | Updated: January 18, 2015 00:53 IST