नागपूरकरांना पाणी मिळेना : गोरेवाड्याची पातळी ३१२.८२ मीटरवरनागपूर : पेंचचा फुटलेला कालवा व गोरेवाडा जलाशयात कमी झालेली पाण्याची पातळी यामुळे गेल्या पाच दिवसांपासून अर्ध्या नागपूर शहराला अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच गोरेवाडातील जलस्तर खाली गेला आहे. पातळी ३१२.८२ मीटरवर आली आहे. परिणामी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे काही भागात अर्धा तास तर काही भागात फक्त १५ मिनिट पाणी मिळत आहे. टँकरनेही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. गोरेवाडा येथीन पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यासाठी पातळी ३१४ मीटरवर येणे आवश्यक आहे. पुढील पाच-सहा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा पाणीपुरवठा कंपनी ओसीडब्ल्यूने केला आहे. पण वास्तविक सध्याचा जलस्तर व त्यात दररोज होत असलेली नाममात्र वाढ पाहता पुढील दहा दिवस अशीच टंचाई राहण्याची शक्यता आहे. गोरेवाडा तलावातून दररोज ४४० एमएलडी (दशलक्ष घनमीटर) पाण्याची उचल केली जाते. मात्र, महादुला येथूल कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होत असल्यामुळे ६० ते ७० एमएलडी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जलकुंभ पूर्णपणे भरले जात नसून बहुमजली इमारतींमध्ये नळाद्वारे पाणी चढेनासे झाले आहे. पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण व मध्य नागपुरात पाणी ेटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना कसेतरी पिण्यापुरते पाणी मिळत आहे. नळाला दहा मिनिट पाणी येते व लगेच नळ बंद होते. टँकर देण्यासाठी नगरसेवकांना फोन केला असता ते पाणी टंचाईचे कारण समोर करीत आहेत. त्यामुळे नागरिकांची चिंता आणि संताप वाढला आहे. (प्रतिनिधी)
जलस्तर घसरला, चिंता वाढली
By admin | Updated: November 23, 2014 00:39 IST