एकाचा मृत्यू : दुसरा गंभीर जखमी नागपूर : जंगलातील हरीण पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करू लागले आहेत. त्यापैकी काही हरीण थेट गावांमध्ये शिरत आहे. अशाच बुधवारी कामठी वस्तीत शिरलेल्या एका हरणावर कुत्र्यांनी हल्ला चढवून, त्याला जखमी केल्याची घटना पुढे आली आहे. शिवाय दुसरे एक हरीण मृतावस्थेत आढळून आले आहे. या दोन्ही घटनांनी वन्यप्राण्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला आहे. वन विभाग जंगलात वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था केली असल्याचे सांगत आहे. त्यावर दरवर्षी कोट्यवधीचा निधीही खर्च केला जात आहे. मात्र या दोन्ही घटनांनी वन विभागाची चांगलीच पोलखोल केली आहे. माहिती सूत्रानुसार बुधवारी जंगलातून भटकलेले एक हरीण कामठी येथील सैनिकी छावणी परिसरात शिरले होते. कुत्र्यांना ते दिसताच, त्याच्यावर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. काही जागृत नागरिकांनी त्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून त्याला वाचविले. शिवाय घटनेची लगेच वन विभागाला माहिती देण्यात आली. यानंतर त्या जखमी हरणाला उपचारासाठी नागपुरात आणण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार करून, सध्या त्याला सेमिनरी हिल्स येथील मृग विहारात ठेवण्यात आले आहे. मात्र त्याची स्थिती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. यापाठोपाठ गुरुवारी सकाळी पुन्हा त्याच परिसरात एक हरीण मृतावस्थेत आढळून आले. त्याचे पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले असता, डॉक्टरांनी घाबरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)
हरणांची पाण्यासाठी भटकंती
By admin | Updated: May 16, 2014 00:50 IST