लोकमत न्यूज नेटवर्क
हावडा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी पार पडले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३१ जागांवर ७८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दिवसभरात हुगळी जिल्ह्यातील काही जागांवर हिंसेच्या घटना घडल्याने तणाव होता. बऱ्याच ठिकाणी भाजप व तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी व दगडफेक झाली. मतदानादरम्यान झालेल्या या संग्रामामुळे राजकीय वातावरणदेखील तापले होते.
सकाळच्या सुमारास मतदानाला सुरुवात झाल्यापासून मतदारांची गर्दी दिसून येत होती. मतदानाशी संबंधित नियमांचा भंग होत असल्याचा दावा तृणमूलतर्फे करण्यात आला. हुगळी जिल्ह्यातील हरिपाल विधानसभा क्षेत्रातील विविध बूथजवळ हिंसाचाराच्या घटना झाल्या. खालाकूल विधानसभा क्षेत्रातील जिंगरा भागात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार नजबूल करीम यांच्यावर हल्ला झाला. त्यात ते जखमी झाले. तर आरामबाग येथील तृणमूलच्या उमेदवार सुजाता मंडल यांच्यावरदेखील हल्ला झाला. अनेक कार्यकर्ते हातात काठ्या घेऊन त्यांच्या मागे धावले. तर नाचिंगडंगा गावात हाणामारीत भाजपचे मंडळ अध्यक्ष जखमी झाले. गोघाट विधानसभा क्षेत्रातील एका बूथवर भाजपच्या बूथ एजंट्सवर हल्ला करण्यात आला. भाजपने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला.
मतदान केंद्रात तोडफोड
हावडा येथील जगतवल्लभपूर हायस्कूलमध्ये मतदानादरम्यान तोडफोड करण्यात आली. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आयएसएफच्या बूथ एजंट्सला धमकी दिली व त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. सातसा भागातील पोलिंग बूथवर आयएसएफच्या कार्यकर्त्यांनी गावठी बॉम्ब फेकल्याचा
आरोप तृणमूलकडून करण्यात आला.
तृणमूलची निवडणूक आयोगाकडे तक्रार
सुजाता मंडल यांच्यावरील हल्ल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असून सीआरपीएफ जवानांनी काहीच कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाने प्रशासनाला यासंदर्भात अहवाल मागविला आहे.