विदर्भवाद्यांचे आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदननागपूर : राज्य विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य द्या, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.समितीतर्फे मंगळवारी विदर्भातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले. नागपुरातही समितीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना भेटले व त्यांना निवेदन सोपविले. यावेळी समितीचे पदाधिकारी डॉ. श्रीनिवास खांदेवाले, विक्रम बोके, प्रवीरकुमार चक्रवर्ती, दीपक निलावार, राम नेवले, अॅड. नंदा पराते, प्रवीण महाजन, दिलीप नरबडिया, जे.पी. शर्मा, बलबीरसिंग रेणू, अविनाश पटवर्धन, अरुण केदार, अण्णाजी रजेधर, गणेश शर्मा, घनश्याम पुरोहित, शेरखाँ पठाण, भीमराव फुसे, डॉ. प्रभाकर बोरकर, वसंतराव कांबळे, एम.जे. शेख, लक्ष्मण पोटे, महेश दुरुगकर, प्रदीप अंमलवार, अश्विन तिवारी, विनीत पराते, आनंदराव लिखार उपस्थित होते. विदर्भातील नागरिकांची स्वतंत्र राज्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. तेलंगण राज्य निर्मितीनंतर वैदर्भीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जनभावनेचा सन्मान करून विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांविरोधात घोषणाशिष्टमंडळातील सदस्यांच्या संख्येवरून समितीचे प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्यात वाद झाला. शिष्टमंडळात एकूण ३५ सदस्य होते. इतक्या जम्बो शिष्टमंडळाला कक्षात बोलवण्यास जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी नकार दिला. पाच जणांचे शिष्टमंडळ पाठवा, अशी सूचना त्यांनी केली. मात्र समितीचे सदस्य त्याला राजी नव्हते. आम्ही सर्वच भेटू, यावर समितीचे सदस्य आग्रही होते. या मुद्यावरून जिल्हाधिकारी आणि समितीचे सदस्य यांच्यात शाब्दिक वादही झाला. निवृत पोलीस महानिरीक्षक प्रवीरकुमार चक्रवर्ती व प्रवीण बोके (आयपीएस) यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अखेर कृष्णा यांनी जम्बो शिष्टमंडळास भेटण्याची तयारी दाखविली. मात्र या एकूणच प्रकरणाचा विदर्भ राज्य आंदोलन समितीने निषेध करून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणा दिल्या.
विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ द्या
By admin | Updated: July 4, 2014 01:19 IST