नागपूर : आता भाज्या मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध असून स्थानिक, जिल्हा आणि अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आवक वाढली आहे. ठोकमध्ये भाज्या स्वस्त असून किरकोळमध्ये भाव दुप्पट आहेत. मार्च अखेरपर्यंत भाज्यांची आवक वाढणार आहे. ठोकमध्ये भाज्या स्वस्त असल्या तरी शेतकऱ्यांना हवा तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत.
किरकोळमध्ये खरेदी करताना ग्राहकांच्या खिशावर ताण येत आहे. कॉटन मार्केटमध्ये नवीन वर्षात भाज्यांची आवक वाढली आहे. सर्व प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी येत आहेत. आवक आणखी वाढल्यास भाव कमी होतील. कॉटन मार्केटमध्ये दररोज लहान-मोठ्या १६० पेक्षा जास्त गाड्यांची आवक आहे. या बाजारात शेतकऱ्यांना जास्त भाव मिळत असल्यामुळे आणि स्थानिक उत्पादकांकडून आवक वाढल्याचे कॉटन मार्केट सब्जी, फ्रूट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.
महाजन म्हणाले, फूलकोबी स्थानिक शेतकरी आणि औरंगाबाद येथून येत आहे. पत्ताकोबी बेंगळुरू, हिरवी मिरची रायपूर, जळगाव, परतवाडा, नाशिक, टमाटर बेंगळुरू, संगमनेर, नाशिक, कोथिंबीर नाशिक, पंढरपूर, छिंदवाडा, गवार शेंग गोंदिया, भंडारा, तोंडले रायपूर, भिलई, सिमला मिरची टाटानगर, बीन्स शेंग नाशिक, दिल्ली, वाल शेंग यवतमाळ, लवकी स्थानिक व राजनांदगाव, कोहळे स्थानिक, यवतमाळ, जळगाव आणि फणस ओरिसा येथून येत आहेत. स्थानिक उत्पादकांकडून विक्रीसाठी येणारे वांगे, फूलकोबी, पत्ताकोबी, कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मटरचे भाव आटोक्यात आहेत.
रविवारी किरकोळ बाजारातील किलो भाव वांगे १० रुपये, फूलकोबी १५, पत्ताकोबी १०, हिरवी मिरची ३०, टोमॅटो १० ते १५, कोथिंबीर २०, चवळी शेंग ३०, गवार शेंग ४०, तोंडले ३०, सिमला मिरची ३०, पालक १०, चवळी भाजी १०, बीन्स ४०, लवकी १५ ते २०, कोहळे २५ ते ३०, काकडी १५ ते २०, गाजर २० ते २५, मुळा १० ते १५, कारले ३०, शेवगा शेंग ५० रुपये.