कोथिंबीर ५० रुपयांवर : कांदे-बटाटे आटोक्यातनागपूर : महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत असून दरदिवशी जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींच्या बजेटमध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी भाज्यांची लागवड थांबविली आहे. नवीन लागवड आॅगस्टपासून सुरू होऊन नवीन माल दसरा-दिवाळीपर्यंत बाजारात येईल. तोपर्यंत ग्राहकांना भाज्या महागच मिळतील.वांगे, पालक, कोहळे या भाज्यांचे दर आटोक्यात असून बहुतांश महाग भाज्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे बाजारात चित्र आहे. भाज्या महागल्याने स्वयंपाकघरात कडधान्याचा वापर होऊ लागला आहे. आवक कमी असल्याने किरकोळच नव्हे तर ठोक बाजारातही भाज्या महाग आहेत. किरकोळमध्ये सांबार ५० ते ६० रुपये किलो आणि हिरवी मिरची ४० रुपयांवर गेल्याने भाज्यांचा तडका तिखट झाला आहे. किरकोळमध्ये फुलकोबी २५ रुपये आणि टमाटर ४० रुपयांवर पोहोचल्याची माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली. बाहेरून आवक कमीकॉटन मार्केट ठोक भाजी बाजारात संगमनेर व नाशिकहून टमाटर, गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, छिंदवाडा व औरंगाबाद येथून फुलकोबी आणि परतवाडा, जगदलपूर, रायपूर येथून हिरव्या मिरचीची आवक आहे. नागपूरलगतच्या परिसरातून चवळी भाजी, पालक, भेंडी, कारले आदींची आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये लहानमोठ्या १५० गाड्या येत आहेत. या बाजारातून अन्य ठिकाणी भाज्या विक्रीसाठी जात असल्याने सध्या भाज्यांचा तुटवडा जाणवत असल्याचे अडतियांनी सांगितले. कांदा-बटाट्याचे दर स्थिरसध्या कळमन्यात कांदा आणि बटाट्याची आवक अपेक्षेनुरूप असल्याने भाव स्थिर आहेत. जूनच्या अखेरीस भाव वधारतील, अशी शक्यता कळमन्यातील आलू-कांदा असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. कळमन्यात लाल कांदा ५०० ते ६५० रुपये मण (४० किलो) आणि पांढरा कांदा ७०० ते ८०० रुपये मण भाव आहेत. किरकोळमध्ये दर्जानुसार १५ ते २५ रुपयांदरम्यान भाव आहेत. कळमन्यात दररोज ४० ट्रक लाल आणि पांढरा कांदा विक्रीस येतो. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची साठवणूक केली आहे. आवश्यतेनुसार ते विक्री करतात. त्याचाही परिणाम भाववाढीवर होत असतो. सध्या विदर्भात कांद्याची लागवड वाढली आहे. अकोला, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यासह नाशिक, मनमाड, अहमदनगर येथून कांदे विक्रीसाठी येत आहेत. भाज्यांच्या वाढीव किमतीचा परिणाम बटाट्यांच्या किमतीवर दिसून येतो. किरकोळ बाजारात दर्जानुसार २२ ते २५ रुपये किलो भाव आहे. ठोक बाजारात भाव प्रति किलो १४ ते १९ रुपयादरम्यान आहेत. भाज्यांच्या किमती वाढल्यास बटाट्याची मागणी वाढेल, परिणामी किमत वधारतील, असे वसानी म्हणाले. सध्या कळमन्यात छिंदवाडा, आग्रा, कानपूर, अहमदाबाद येथून दररोज १६ ते २० ट्रकची आवक आहे. रविवारी बटाट्याचे भाव ६५० ते ७२५ रुपयांदरम्यान (४० किलो) होते. (प्रतिनिधी)
भाज्या महाग, बजेट बिघडले
By admin | Updated: June 24, 2014 00:59 IST