व्यथा गोंडवाना विद्यापीठाची : साडेसहा महिन्यांपासून कुलगुरू नाहीगडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली या शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाणा विद्यापिठाचा कारभार मागील साडेसहा महिन्यांपासून कुलगुरूविना सुरु आहे. आधी लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत विद्यापिठाचा कुलगुरू निवडण्याची प्रक्रिया रखडली आहे. विद्यापीठाला कायम कुलगुरू कधी मिळतो याकडे साऱ्यांचे डोळे लागले आहेत. २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासाठी गोंडवाना विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला. २ आॅक्टोंबर २०११ ला विद्यापीठाच्या निर्मितीची अधिसूचना जारी करण्यात येऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात करण्यात आली. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून राज्यपालांनी शासन निर्णयानुसार डॉ. विजय आर्इंचवार यांची निवड केली. विजय आर्इंचवार हे ७ मार्च २०१४ ला वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त झालेत. त्यानंतर नवीन कुलगुरू नियुक्त करणे आवश्यक होते. परंतु विद्यापीठात शासनाने व्यवस्थापन व विद्वत्त समिती स्थापन केली नाही. याशिवाय कोणत्याही अकॅडेमीक समित्यांची स्थापना केली नाही. कुलगुरू निवड प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणारी समितीच अस्तित्वात नसल्याने ही प्रक्रिया सुरूच झाली नाही. दरम्यान मार्च महिन्यात १६ लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने विभागीय आयुक्तांनी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांची प्रभारी कुलगुरू म्हणून नियुक्ती केली. ते अद्याप काम पाहत आहे. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे आणखी एक ते दीड महिने विद्यापीठाला नवा कुलगुरू मिळणे कठीण आहे. सध्या कुलसचिवच सर्व कारभार पाहत आहेत. कुलगुरूविना काम सुरुअसल्याने दोन्ही जिल्ह्यातील २२७ महाविद्यालयांचे अनेक शैक्षणिक प्रश्न खोळंबले आहेत. या संदर्भात मध्यंतरी प्राचार्य फोरमनेही जाहीर नाराजी व्यक्त केली होती. (जिल्हा प्रतिनिधी)
दोन निवडणुकांच्या आचारसंहितेत अडकली कुलगुरू निवड प्रक्रिया
By admin | Updated: September 18, 2014 00:42 IST