मुनिश्री प्रतीकसागर महाराज यांचा उपदेश नागपूर : मुनिश्री प्रतीकसागर महाराज यांचे प्रवचन शुक्रवारी अजितनाथ जैन मंदिर केळीबाग रोड, बडकस चौैक येथे पार पडले. याप्रसंगी मुनिश्री म्हणाले, व्यक्तीने आपल्याला मिळालेल्या भौतिक सुख-सोयीवर गर्व करू नये आणि आपल्या दुरवस्थेवर अश्रूही ढाळू नये. यावेळी त्यांनी कळी आणि दगडाची गोष्ट सांगितली. ज्यात एका दगडातून मूर्ती घडवून त्याला देवरूप देण्यात येते. ज्यात जीव आहे, अशा कळीला त्याच्या चरणावर अर्पण करण्यात येते. मानवाने सुद्धा जोपर्यंत शरीरात शक्ती आहे, तोपर्यंत धर्मकार्य करून घ्यावे, वृद्धापकाळात धर्मकार्य करणे कठीण होते. त्याचबरोबर मुनिश्री म्हणाले, वेळेचे महत्त्व जाणून घ्यावे, बुद्धिवंत तोच आहे, जो वेळेची किंमत करतो. शनिवारी मुनिश्रीचे प्रवचन अजितनाथ जैन मंदिरात सकाळी ८.१५ वाजता होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता आनंदयात्रा खंडेलवाल भवन येथे होईल. शुक्रवारी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन विश्व हिंदू परिषदेचे श्रीकांत आगलावे, सुमत लल्ला, दिनेश जैन, चंद्रकुमार चौधरी, रवींद्र आग्रेकर, पवन कान्हीवाडा यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी मंदिराचे अध्यक्ष कमल बज, कार्याध्यक्ष रतनलाल गंगवाल, विनोद झांझरी, आनंद ठोल्या, रवी बज, विजय उदापूरकर, सुरेंद्र ठोल्या, अभय बोहरा आदी उपस्थित होते. रविवार १७ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता मुनिश्रींची शोभायात्रा काढून श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन मोठे मंदिर, बापूनगर, इतवारी येथे स्वागत होईल.
शरीरात शक्ती असेपर्यंत धर्मकार्य करा
By admin | Updated: July 16, 2016 03:04 IST