नागपुरातील दहा युवकांचा पुढाकार नागपूर : जम्मू-काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी या हेतूने नागपुरातील तरुणांनी १५ आॅगस्ट रोजी श्रीनगर विमानतळावर तिरंगा फडकविला. मात्र यावेळी त्यांना फुटीरवाद्यांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला. या विशेष अभियानासाठी मागील १० आॅगस्ट रोजी नागपुरातील १० तरुण जम्मू-काश्मीरसाठी रवाना झाले होते. यानंतर त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी प्राप्त केली. तसेच जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना परवानगीसाठी पत्र पाठविले होते. तरुणांच्या या पथकाचे प्रमुख बाबा मेंढे यांच्या मते, ज्यावेळी त्यांचे पथक श्रीनगर विमानतळावर पोहोचले, त्यावेळी तेथे कलम १४४ लागू करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना बाहेर जाऊ देण्यात आले नाही. अशा स्थितीत सर्व तरुणांनी विमानतळावरच तिरंगा फडकवून राष्ट्रगीत म्हटले. तरुणांच्या या पथकात अहमदाबाद येथील तन्जुम इरानी आणि शकील सैफी यांच्यासह देशभरातील शेकडो तरुणांचा समावेश होता. दरम्यान विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानांनी श्रीनगरमधील परिस्थिती फार तणावपूर्ण असल्याचे सांगितले. मात्र देशभरातून पोहोचलेल्या या तरुणांनी विचलित न होता, विमानतळावर तिरंगा फडकवून ‘वंदेमातरम्’ च्या जोरदार घोषणा दिल्या. (प्रतिनिधी)
श्रीनगर विमानतळावर फडकविला तिरंगा
By admin | Updated: August 19, 2016 02:40 IST