नागपूर : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने जाहीर केल्यानुसार २६ मे रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभा, जय जवान जय किसान संघटना २६ मे रोजी देशव्यापी काळा दिवस पाळून सहभाग दर्शविणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला २६ मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. तर, २६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ मे रोजी सहा महिने पूर्ण होत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून देशात समस्या वाढल्याच्या निषेधार्थ २६ मे हा काळा दिवस पाळला जात आहे. नागपुरात दुपारी १ वाजता संविधान चौकात काळे झेंडे घेऊन निदर्शन केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अरुण वनकर आणि जय जवान जय किसान संघटनेचे अभिनव फटिंग यांनी दिली.