महागाव (यवतमाळ) : खंडणीसाठी नक्षलवाद्यांच्या नावाने दुकानात पत्रके टाकण्याचा प्रकार तालुक्यातील फुलसावंगी येथे मंगळवारी उघडकीस आला. माओवादी संघटनेच्या नावावर व्यापार्यांना पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असून यासाठी २१ मे चा अल्टीमेटम देण्यात आला आहे. या पत्रकाने व्यापार्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून महागाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील फुलसावंगी ही मोठी बाजारपेठ आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे येथील दुकानदारांनी दुकाने उघडली. तेव्हा सहा दुकानांमध्ये माओवादी संघटनेच्या नावाने लिहिलेली पत्रके आढळली. त्यात बालाजी कृषी केंद्र, पांडे भुसार मार्केट, साई अॅग्रो एजन्सी, दत्तकृपा कृषी केंद्र, गौरीशंकर कृषी केंद्र, जयस्वाल भुसार मार्केट या दुकानांचा समावेश आहे. या पत्रकात माओवादी संघटना बीट क्र. ३६ चा कमांडर रामक्रिपा बाली याच्या आदेशाने पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. २१ मे रोजी पाच लाख रुपये घेऊन सारकिन्ही येथील बसस्थानकावर येण्याचे या पत्रकात म्हटले आहे. पैसे दिले नाही तर जीवाची जबाबदारी तुमच्यावर राहील, अशी धमकीही या पत्रकात दिली असून शेवटी ‘जय महाकाल’ असे लिहिलेले आहे. पत्रक पाहताच व्यापार्यात एकच खळबळ उडाली. व्यापार्यांनी पंचायत समितीचे उपसभापती विजय महाजन यांच्या नेतृत्वात बैठक घेतली. त्यानंतर महागाव ठाण्यात रवींद्र पांडे, गुजाबराव उबाळे, विश्वनाथ गोरे, सुरेश जयस्वाल, मनोज भास्करवार, संदेश मुत्तेपवार यांनी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक एस.बी. दुधाळ यांच्याकडे देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
खंडणीसाठी नक्षल्यांच्या नावाने धमकी
By admin | Updated: May 21, 2014 01:00 IST