नागपूर : राज्यातील अनेक कंपन्या व वीज सहकारी संस्थांकडे महावितरणचे हजारो कोटी रुपये थकित आहेत. यासंदर्भातील जनहित याचिकेत महावितरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना प्रतिवादी करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना नोटीस बजावून २५ फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहक पंचायतने ही याचिका दाखल केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरस्थित मुळा प्रवरा वीज सहकारी संस्थेकडे २००२ मध्ये ७५० कोटी रुपये थकित होते. यानंतर शासनाने संस्थेला २५० कोटी रुपयांची सूट देऊन उर्वरित रक्कम भरण्याचे आदेश दिलेत. परंतु, ही रक्कम अद्याप वसूल झालेली नाही. १३ वर्षांत ही रक्कम दोन हजार कोटींवर गेली आहे. अशा अनेक संस्था व कंपन्यांकडे वीज बिलाची थकबाकी आहे. हा आकडा सुमारे १५ हजार कोटी रुपये आहे. राजकीय आशीर्वादामुळे सर्व गैरव्यवहार सुरळीत सुरू आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. राम परसोडकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
हजारो कोटी थकीत महावितरण प्रतिवादी
By admin | Updated: February 9, 2015 00:56 IST