साहित्याच्या आड राजकारण करत असल्याचा आरोप : भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्हनागपूर : पुरोगामी विचारवंतांची हत्या व दादरी येथील घटना तसेच देशातील वाढती असहिष्णुता यांचा निषेध व्यक्त करीत पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टीका केली आहे. हे साहित्यिक जाणूनबुजून असे पाऊल उचलत असून साहित्याच्या आडचे हे राजकारण असल्याचा आरोप संघातर्फे करण्यात आला आहे. या साहित्यिकांनी देशासोबतच साहित्यप्रेमींचा अपमान केला असल्याचे संघाकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे.देशात धर्मांधतेच्या विषाचा केला जाणारा प्रसार आणि वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी देशभरातील विविध राज्यांमधील सुमारे २६ ज्येष्ठ साहित्यिकांनी पुरस्कार परत केले आहे. काहींनी साहित्य अकादमीच्या सदस्यत्वाचा राजीनामादेखील दिला आहे. मराठीतील चार साहित्यिकांनीदेखील आपापले पुरस्कार परत केले आहे. यासंदर्भात केंद्राच्या भूमिकेवर टीका होत असतानाच संघाने केंद्राची बाजू घेत साहित्यिकांवर प्रहार केला आहे. संघाकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. अशा प्रकारे पुरस्कार परत करणे हा साहित्य अकादमीसोबत साहित्याचादेखील अपमान आहे. जे साहित्यिक साहित्य अकादमीमध्ये वर्चस्व गाजवत होते व जवळच्या साहित्यिकांना पुरस्कार वाटत होते, तेच आता अकादमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. याचा त्यांना अधिकारच काय व पुरस्कारासोबत ते रक्कमदेखील परत करणार का, असे प्रश्न संघाने उपस्थित केले आहेत.(प्रतिनिधी)तेव्हा कुठे होते हे साहित्यिक?बांगलादेशच्या साहित्यिक तस्लीमा नसरीन यांचे शीर आणून देणाऱ्याला बक्षिसाची घोषणा करण्यात आली, गोधरामध्ये निरपराध कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले, काश्मीरमध्ये अनेक निरपराध मृत्युमुखी पडत आहे. यावेळी हे साहित्यिक कुठे गेले होते, असा प्रश्न संघाकडून करण्यात आला आहे. या साहित्यिकांना साहित्याशी काहीही घेणेदेणे नसून केवळ साहित्य अकादमीतील एकाधिकार संपुष्टात येण्याच्या भीतीपोटीच त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे संघाकडून पाठविण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.‘त्या’ साहित्यिकांची प्रामाणिकता तपासायची गरज : भय्याजी जोशीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनीदेखील संबंधित साहित्यिकांवर टीकास्त्र सोडले आहे. जे साहित्यिक पुरस्कार परत करत आहेत, त्यांची प्रामाणिकता तपासून पाहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. दादरीच्या घटनेचा उल्लेख न करता भय्याजी म्हणाले की, या देशात या आधी ही अशा घटना घडल्या आहेत. मात्र तेव्हा कुणीच पुरस्कार परत केले नव्हते. परंतु आता विनाकारण वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संघ स्वयंसेवक देशाचे वातावरण बिघडवू देणार नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या मुद्यावर केलेल्या वक्तव्याचा विपर्यास झाला असल्याचा दावा करत बिहारमध्ये भाजपचीच सरशी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर संघाची टीका
By admin | Updated: October 14, 2015 03:35 IST