लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे. २० जून रोजी पक्ष कार्यकर्ते, हितचिंतकाशी चर्चा केली. त्यानंतरच आपण पक्षांतराचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रकही जाहीर केले आहे.
बसपा आता पूर्वीसारखी राहिली नाही. पक्षाची खूपच पीछेहाट झाली आहे. हा पक्ष आता केवळ नावापुरता राष्ट्रीय राहिला आहे. त्यासाठी पक्षनेतृत्वच जबाबदार असून मायावतींनी बहुजन समाज पक्षाची चळवळ किंवा आंदोलनाचे स्वरूप जवळपास संपवले आहे. आता बहुजन समाज पक्ष हा एक सत्ताकारणातील राजकीय पक्ष झाला आहे, अशी टीका साखरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
बॉक्स
वीरसिंग, ताजणेंवरही प्रहार
वीरसिंग हे अनेक वर्षापासून बसपाचे महाराष्ट्र प्रभारी आहेत. ते आल्यापासून पक्षाची ताकद वाढविण्याऐवजी ती कमी झालेली आहे. वीरसिंग हे मायावतींना चुकीची माहिती देतात. त्यामुळे बसपाच्या पदरी सतत अपयश येत आहे. हा पक्ष दुबळा झालेला आहे. वीरसिंग यांनी पक्षाची चिमूटभरही ताकद वाढविलेली नाही. बसपाचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे तडजोड करून निवडणूक लढवितात. पक्ष वाढविण्याऐवजी हे दोन्ही नेते स्वत:चे कल्याण करण्यातच धन्यता मानत असल्याचा आरोप सुरेश साखरे यांनी केला आहे.