हायकोर्टात अंतिम युक्तिवादाला सुरुवात : पुढील सुनावणी २५ सप्टेंबरलानागपूर : महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय व इतर विविध संदर्भ देऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची नियुक्ती करण्याचा निर्णय योग्य असल्याचे वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांनी आज, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सांगितले.विद्यापीठात लवकरात लवकर कुलगुरूची नियुक्ती करण्यात यावी व कुलगुरूपदी पात्र व्यक्तीची निवड करण्याचा अधिकार, कुलपतींना देणाऱ्या कलमाचा अन्वयार्थ लावण्यात यावा यासाठी सिनेट सदस्य गुरुदास कांबडी यांनी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. आज सुमारे दोन तास सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी २५ सप्टेंबर रोजी निश्चित केली. दरम्यान, कुलपतींतर्फे अॅड. मनोहर यांनी युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद अर्धवट असून पुढच्या तारखेला ते उर्वरित मुद्दे मांडतील. त्यांच्यापूर्वी याचिकाकर्त्याचे वकील भानुदास कुलकर्णी व मध्यस्थ प्रा. सुनील मिश्रा यांनी बाजू मांडली. नियमित कुलगुरूची नियुक्ती शक्य तेवढ्या लवकर करणे किती आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांचे खंडपीठ प्रकरण ऐकत आहे. डॉ. विलास सपकाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर कुलपतींनी गेल्या ३० मार्चच्या आदेशान्वये विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे कुलगुरूचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. कुलगुरू विद्यापीठाच्या सर्व वैधानिक मंडळे व निवड समितीचे प्रमुख असतात. यामुळे अशा पदांवर विद्वान व्यक्तीचीच नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. विद्यापीठातर्फे अॅड. पुरुषोत्तम पाटील, विभागीय आयुक्तांतर्फे अॅड. आनंद परचुरे, तर शासनातर्फे अॅड. भारती डांगरे कामकाज पाहात आहेत.(प्रतिनिधी)
प्रभारी कुलगुरूपदी अनुपकुमार यांच्या नियुक्तीचे समर्थन
By admin | Updated: September 19, 2014 00:51 IST