खडसंगी : मे महिन्याची सुरुवात होताच पाण्याची पातळी खालावत चालली आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करणे सुरु आहे. यावर्षी पाऊस जास्त आल्याने मागच्या वर्षापेक्षा पाणी टंचाईचा सामना जास्त प्रमाणात बसणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र स्थिती उलट आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने तलाव, विहिरी, कूपनलिकेतील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यासह अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. चिमूर पंचायत समिती अंतर्गत ९८ ग्रामपंचायती असून २६३ गावांचा समावेश आहे. या गावांना पाणी पुरवठा करण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या नळ योजना, विंधन विहिरी, हातपंपाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात २७९ विंधन विहिरी, ८२५ हातपंप, तर पॉवरपंपाद्वारे या गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ही व्यवस्था कमी पडत आहे. त्यामुळे नवीन विंधन विहिरी व हातपंपाची बºयाच गावात आवश्यकता भासत आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून उष्णता वाढत आहे. उष्णता वाढल्याने इरई धरण, चंदई नाला, चारगाव धरण, घोडाझरी तलावातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. (वार्ताहर)
उन्हाच्या झळा वाढल्या; पाण्याने तळ गाठला
By admin | Updated: May 5, 2014 00:32 IST