कुंभारी बसथांब्यावर नारेबाजी : रोडवर जाळले टायर, पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल तारसा : परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मौद्याला जाण्यावाचून गत्यंतर नाही. रामटेक-मौदा मार्गावर बसफेऱ्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. या मार्गावर बसफेऱ्या वाढविण्याची मागणी रामटेक आगाराला अनेकदा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दरम्यान, शनिवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अंदाजे ५०० विद्यार्थ्यांनी रामटेक-मौदा मार्गावरील कुंभारी बसथांब्याजवळ ‘बस रोको’ आंदोलन केले. यावेळी बसेसची तोडफोड करून बसचालक व वाहकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप एस.टी. कर्मचाऱ्यांनी केला. दुसरीकडे, या मार्गावरील कोणत्याही बसची साध्या काचादेखील फुटल्या नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. शिवाय, विद्यार्थ्यांनी शांततेने आंदोलन करीत कुणालाही मारहाण किंवा धक्काबुक्की केली नाही. असे असले तरी पाच आंदोलकांवर गुन्हे नोंदविपण्यात आले. त्यामुळे चालक व वाहकांच्या या कृत्याविषयी सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मौदा तालुक्यातील नंदापुरी, नेरला, चाचेर, नवेगाव, आष्टी, तारसा, निमखेडा, बानोर, हिवरा, गांगनेर, इसापूर, बाबदेव, मांगली, कुंभापूर, कोपरा, साखर कारखाना, कुंभारी, नानादेवी, डहाळी, राहाळी यासह परिसरातील काही गावांमधील अंदाजे ५०० विद्यार्थी रोज शिक्षणासाठी मौद्याला जातात. हे सर्व विद्यार्थी रामटेक - मौदा मार्गावर धावणााऱ्या एसटी बसने शाळेत जाण्यासाठी व घरी परत येण्यासाठी प्रवास करतात. या मार्गावर रामटेक आगाराच्या रोज सकाळी ६ वाजताच्या सुमारास दोन बसेस सोडल्या जातात. या बसेस तारसापर्यंत फुल्ल होतात. त्यामुळे बाबदेव, तारसा ज्वॉर्इंट, कुंभारी, कुंभापूर व काही गावांमधील विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यासाठी जागा राहात नसल्याने रोज सकाळी ७.३० वाजल्यानंतर शाळेत पोहोचावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी या मार्गावर सकाळीच्या बसफेऱ्या वाढविण्याची मागणी रामटेक आगार प्रमुखाकडे अनेकदा केली. शनिवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास कुंभारी बसथांब्याजवळ विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत उभे होते. बसमध्ये जागा नसल्याने विद्यार्थ्यांनी बस अडवून रोडवर टायर जाळत ‘बस रोको’ आंदोलनाला सुरुवात केली. काही वेळातच माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गोरले, राजू महल्ले, गोलू गोडबोले, प्रवीण कारेमोरे, राजेराम तिजारे, बाबूराव गोडबोले, सुरेंद्र येळणे, महेश तिजारे, राहुल गोडबोले, ओमदेव गोडबोले आदी आंदोलनस्थळी पोहोचले. यावेळी विद्यार्थ्यांनी चार बसेस रोखून धरल्या होत्या. रामटेक आगार प्रमुखाशी फोनवर संपर्क साधला असला, सकाळी ७.३० पर्यंत त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी फोन बंद करून ठेवल्याने आगारात फोनवर संपर्क साधला. तेव्हा आगार प्रमुख जे.आर. दाऊ हे नागपूरला मिटिंगला सकाळी ७ वाजता गेल्याचे सांगण्यात आले. सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास मौद्याचे ठाणेदार भीमराव टेळे, नायब तहसीलदार नीलेश कदम आंदोलनस्थळी दाखल झाले. दरम्यान, उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांनी मध्यस्थी करीत ही समस्या मंगळवारला (दि. १६) सोडविण्याचे आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी लगेच आंदोलन मागे घेतले. मौदा पोलिसांनी देवेंद्र गोडबोले, चंद्रशेखर गभणे, अमरदीप नारनवरे, जितेंद्र गोरले, संदीप गोडबोले यांच्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला. (वार्ताहर) विद्यार्थ्यांचे हाल रामटेक आगारातील कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सकाळी ८ ते दुपारी १.३० पर्यंत एकही बस आगाराबाहेर पडली नाही. त्यामुळे या काळात शाळा आटोपल्यानंतर घरी जाणारे शेकडो विद्यार्थी रामटेक बसस्थानकात अडकून पडले होते. सदर विद्यार्थी भुकेने व्याकूळ झाले होते. त्यामुळे काही शिक्षकांनी मध्यस्थी करीत विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्याची सूचना केली. विद्यार्थी बसमध्ये बसताच एका चालकाने या सर्व विद्यार्थ्यांना बळजबरीने बसमधून खाली उतरविले. या कर्मचाऱ्यांना शालेय विद्यार्थ्यांचीही दया आली नाही. दुसरीकडे, मौदा बसस्थानकातही २७५ विद्यार्थी अडकून पडले होते.
विद्यार्थ्यांचे ‘बस रोको’ आंदोलन
By admin | Updated: August 14, 2016 02:55 IST