नागपूर : महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेल्या करामुळे इतर राज्याच्या तुलनेत पेट्रोलच्या किमती ५ ते ६ रुपयांनी महागल्या आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसतो आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लावलेले कर रद्द करावे, या मागणीसाठी ११ आॅगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. जीवनावश्यक वस्तू असलेले पेट्रोल आणि डिझेलवर २ ते ५ टक्के एलबीटी आकारली जाते. पेट्रोल आणि डिझेलवरील एलबीटीची प्रतिवर्ष वसुली २९० कोटी इतकी आहे. एलबीटीमुळे पेट्रोल ३.५० रुपये व डिझेल २.७५ रुपये महाग झाले आहे. मुंबई महापालिका हद्दीत दोन मुख्य रिफायनरी आहेत. मुंबई महापालिका या रिफायनरीत आयात होणाऱ्या कच्चा तेलावर जकातीची आकारणी करते. ज्याचे वार्षिक उत्पन्न २५०० कोटी इतके आहे. महाराष्ट्रावर या जकातीचा भार २.५० रुपये इतका पडतो आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ५ ते ६ रुपयांनी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलला करमुक्त करण्यात यावे, संपूर्ण राज्यभर एक कर आणि एक दर लावण्यात यावा, अशी मागणी पेट्रोल पंप चालकांची आहे. महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलच्या महागाईमुळे विक्रीत २५ टक्क्यांची घट झाली आहे. राज्याच्या हद्दीजवळील ८०० पेट्रोल पंपाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरकारच्या धोरणामुळे जनतेलाही फटका बसतो आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेनेही सहकार्य करावे, अशी भावना विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असो. चे अध्यक्ष हरविंदरसिंग भाटिया यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली. नागपूरकरांचे या आंदोलनाला समर्थन मिळावे म्हणून ८८८८६८२२२२ या क्रमांकावर एसएमएस करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी असोसिएशनचे सचिव प्रणय पराते व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
११ ला पेट्रोल पंप बंद
By admin | Updated: August 9, 2014 02:31 IST