महापौर, सभापती सत्कारात व्यस्त : प्रभागातील कामे होत नसल्याने नगरसेवकात नैराश्य
महापालिकेची निवडणूक ११ महिन्यावर आली आहे. पण मागील निवडणुकीत सत्तापक्षाने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाही. महापालिकेत नवीन कारभारी आले. काही चमत्कार करतील अशी नगरसेवकांना अशी आशा होती. पण परिस्थितीत बदल होताना दिसत नाही. ३२० कोटींची मागणी असताना प्रशासनाकडून पाच हेडमधून जेमतेम ६० कोटीच्या खर्चाला मंजुरी मिळाली. हा निधी हातोहात संपला. दीड वर्षात जवळपास १५० कोटीची वर्क ऑर्डर झालेली कामे अजूनही सुरू झालेली नाही.
वर्ष २०१९-२० मध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहणे यांच्या कार्यकाळात अर्थसंकल्पात मंजूर झालेली कामे झाली नाही. ही कामे पूर्ण करण्यासाठी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी ३२० कोटींची तरतूद केली. यात प्रामुख्याने प्रभागातील गडरलाईन, चेंबर दुरुस्ती, नाल्याची भिंत दुरुस्ती, अंतर्गत रस्ते, पथदिवे अशा आवश्यक कामांचा समावेश होता. परंतु आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करून प्रशासनाने निधी उपलब्ध केला नाही. दुसरीकडे नवीन पदाधिकारी सध्या सत्कारात व्यस्त आहेत.
राज्य सरकारकडून दर महिन्याला १०० कोटी जीएसटी मिळतो. मालमत्ता कर, पाणीपट्टी, बाजार, नगर रचना व अन्य विभागाकडून ३० ते ३५ कोटी अशाप्रकारे १३० ते १३५ कोटींचा निधी मनपा तिजोरीत जमा होतो, तर आस्थापना खर्च १२० ते १२५ कोटींच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत विकास कामासाठी फारसा निधी शिल्लक राहत नाही. परंतु अशी परिस्थिती मागील अनेक वर्षांपासून आहे. विकास कामांना गती देण्यासाठी महापौर, सत्तापक्ष नेते बदलले, स्थायी समिती अध्यक्षही बदलणार आहे. परंतु विकास कामासाठी निधी मिळत नसल्याने नगरसेवकांची चिंता वाढली आहे.
......
नागरिकांना वेठीस धरू नका
शहराच्या अनके वस्त्यात रस्त्यावरून वाहणारे पाणी, तुंबलेली गटारे, उखडलेले फूटपाथ, अर्धवट झालेली सिमेंट रोडची कामे, तुटलेली बाके यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मात्र आयुक्त म्हणून त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करीत आहात, शहरातील नागरिकांना वेठीस धरू नका, असा थेट आरोप विजय झलके यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केला होता. परंतु त्यानंतरही परिस्थितीत बदल झाला नाही. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी अजूनही वर्क ऑर्डर झालेल्या विकास कामांना ब्रेकच असल्याचे सांगितले.
...
मुंढेंना धारेवर धरणारे हतबल
गेल्या वषीं पाच दिवस चालेल्या महासभेत वर्क ऑर्डर झालेल्या विकास कामाच्या फाईल रोखण्यावरून तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना तत्कालीन महापौर संदीप जोशी व विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांनी धारेवर धरले होते. मुंढे गेले राधाकृष्णन बी. आले पण परिस्थितीत बदल झाला नाही. मुंढेंवर आरोप करणारे हतबल दिसत आहेत.