दयानंद पाईकराव नागपूर प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन खेड्यापाड्यात जाणाऱ्या एसटीमुळे महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे. परंतु प्रवाशांची खऱ्या अर्थाने सेवा करणारे एसटीचे चालक-वाहकच समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. त्यांच्यासाठी असलेल्या विश्रांतीगृहात सुविधांपेक्षा समस्याच अधिक असल्यामुळे थोडी विश्रांती तर सोडा या विश्रामगृहात बसण्याची इच्छा होणार नाही, अशी येथील स्थिती असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून स्पष्ट झाले.महाराष्ट्रातील प्रवाशांना सुविधा देण्यात एसटी महामंडळ अग्रेसर आहे. परंतु एसटीचा कणा असलेल्या चालक वाहकांनाच समस्यांना तोंड देण्याची पाळी आली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती गणेशपेठ बसस्थानकावर चालक-वाहकांना विश्रांती घेण्यासाठी विश्रांतीगृह आहे. नागपुरात विविध जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणावरून चालक-वाहक येतात. त्यांना विश्रांती घेण्यासाठी या विश्रांतीगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु या विश्रांतीगृहात सुविधा कमी आणि समस्याच अधिक आहेत. विश्रांतीगृहाची अवस्था जाणून घेतली असता तेथे उपस्थित चालक-वाहकांनी समस्यांचा पाढाच वाचला. विश्रांतीगृहात कर्मचाऱ्यांसाठी भोजनकक्ष आहे. परंतु या भोजनकक्षाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. भोजनकक्षात स्वच्छ वातावरणाऐवजी कचऱ्याचा ढीग साचल्याचे दृश्य दिसले. स्वच्छतागृहातही कमालीची दुर्गंधी येत होती. बाहेरगावावरून येणाऱ्या चालक-वाहकांना झोपण्यासाठी मोठा हॉल आहे. परंतु या हॉलमध्ये साध्या सतरंजीची सोय करण्यात आलेली नव्हती. हॉलमधील फरशीवर प्रचंड घाण साचलेली होती. याच स्थितीत कर्मचाऱ्यांना येथे विश्रांती करावी लागत आहे. दुपारी ३ वाजता या हॉलच्या बाजूला असलेल्या माठातून पिण्याचे पाणी घेण्यासाठी एक कर्मचारी आला असता माठात पाणीच नसल्यामुळे त्याला आल्यापावली परत जाण्याची पाळी आली. याशिवाय या पिण्याच्या माठाजवळ घाण पाणी साचल्याचे दिसले. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागपुरात कडक उन पडत असल्यामुळे या हॉलमध्ये एसटी महामंडळाने किमान एक कुलर लावण्याची गरज होती. परंतु कुलरची व्यवस्थाच येथे नसल्यामुळे उकाड्यात विश्रांती करण्याची पाळी कर्मचाऱ्यांवर आली आहे.
एसटीच्या विश्रामगृहात समस्यांचा मुक्काम
By admin | Updated: May 22, 2015 02:55 IST