नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, तातडीने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे. यासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी यांना निवेदन देण्यात आले.
लसीकरण केंद्रांवर ४५ वर वय असलेले नागरिक कमी संख्येत येत आहेत. त्यामुळे लसीकरण मंदावले आहे. काही केंद्रांवर दुपारनंतर लस घेणारेच नसतात. अनेक तरुण सरकारी कार्यालये, कारखाने, खासगी कार्यालयात काम करीत आहेत. त्यांना सर्वात जास्त कोरोना संसर्गाचा धोका आहे. ही बाब लक्षात घेता, त्यांचे वेगाने लसीकरण आवश्यक आहे. त्यामुळे १ जूनपासून १८ वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणाची परवानगी देण्यात यावी. त्याची ऑनलाईन नोंदणी न करता केंद्रातच लस देण्यात यावी, अशी मागणी भाजयुमोकडून करण्यात आली. यावेळी भाजयुमोचे अध्यक्ष पारेंद्र पटले, प्रदेश सचिव राहुल खंगार यांच्यासह जितेंद्र ठाकूर, बादल राऊत, शेखर कुर्यवंशी, अमर धरमारे, यश सातपुते, सन्नी राऊत, पंकज सोनकर, रितेश रहाटे, विशाल केचे, आलोक पांडे, जय साजवानी, पीयूष बोईनवार, संकेत कुकडे, मनमीत पिल्लारे, राज तकवत प्रामुख्याने उपस्थित होते.