नागपूर : गंभीर परिस्थिती आणि मोठ्या अपेक्षांचा समतोल साधत कुठलीही मोठी घोषणा किंवा मोठे धोरण न राबविता अर्थमंत्र्यांनी समतोल साधत फक्त आवश्यक गोष्टींना चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. सामान्य करदाते, नागरिक आणि व्यावसायिक यांना कुठलीही वाढीव सवलत तथा करमुक्ती दिली नसली तरीही नवीन कोविड अधिभार लावला नाही, हेसुद्धा दिलासा देणारे आहे. पायाभूत सुविधांकरिता योग्य तरतुदी, सरकारी बँकांसाठी भरीव भांडवल मदत, तीन वर्षांनंतर आयकराची पुनर्तपासणी न होणे, एक व्यक्ती कंपनीकरिता कुठलीही भांडवल अथवा विक्री मर्यादा नसणे, बहुराज्यीय सहकारी संस्थेसाठी नवीन नियामक मंडळ गठीत करणे, आदी अर्थसंकल्पाच्या जमेच्या बाजू आहेत. अपेक्षित सरकारी उत्पन्न आणि खर्चाचा समतोल साधत कोरोना महामारीतून भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा संजीवनी कशी देता येईल, याचा प्रमाणबद्ध संकल्प अर्थसंकल्पात दिसून येतो. यंदाचा अर्थसंकल्प उद्योग-व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अर्थसंकल्प प्रतिक्रिया ...
बजेट प्रगतिशील व व्यापक ()
बजेट एक प्रगतिशील व व्यापक असून अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला सुनिश्चित करणार आहे. व्यापाऱ्यांना व्यवसाय करताना सुविधा मिळणार आहे. बजेटमध्ये कोणतेही नवे कर नाहीत. देशातील वरिष्ठ नागरिकांना कराच्या बोझ्यापासून सुटकारा आणि आरोग्य व त्याच्या सेवांना सुनिश्चित करणे, ही बजेटची मुख्य विशेषत: आहेत.
सीए बी. सी. भरतीया, अध्यक्ष, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट).
स्वास्थ्य व टॅक्सपेयर केंद्रित ()
कोणताही नवीन कर न आकारता आणि आरोग्य सुविधांना जास्त निधी दिल्याने बजेट स्वास्थ्य आणि टॅक्सपेयर केंद्रित आहे. कर सुधारणेच्या दिशेने सरकारने पाऊले उचलली आहेत. करांच्या स्लॅबमध्ये बदल न केल्याने सामान्य नागरिक निराश आहेत. सीमाशुल्क कपातमुळे स्टील आणि सोन्याच्या किमतीत घसरण होईल. कंपनी कायदे सरळसोपे होणार आहेत.
श्रवण मालू, अध्यक्ष, विदर्भ टॅक्सपेयर असो.
सरकारने करदात्यांचा विश्वास जिंकला ()
करदात्यांना नवीन करापासून दिलासा आणि ईज ऑफ डुईंग बिझनेससंदर्भात सकारात्मक पाऊले सरकारने उचलली आहेत. आरोग्य क्षेत्राला जास्त निधी देऊन क्षेत्र मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. नागपूर मेट्रो दुसऱ्या टप्प्यांसह शेतकरी व पायाभूत सुविधांना महत्त्व देऊन विशेष तरतूद केल्याचा फायदा होणार आहे. कोरोना नुकसान झालेल्या हॉटेल व्यवसायाला दिलासा मिळाला नाही.
तेजिंदरसिंग रेणू, सचिव, विदर्भ टॅक्सपेयर असो.
अर्थव्यवस्थेच्या संजीवनीसाठी प्रमाणबद्ध संकल्प ()
अपेक्षित सरकारी उत्पन्न आणि खर्चाचा समतोल साधत कोरोना महामारीतून भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा संजीवनी कशी देता येईल, याचा प्रमाणबद्ध संकल्प अर्थसंकल्पात आहे. गंभीर परिस्थिती आणि मोठ्या अपेक्षांचा समतोल साधत कुठलीही मोठी घोषणा किंवा मोठे धोरण न करता अर्थमंत्र्यांनी समतोल साधत फक्त आवश्यक गोष्टींना चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे.
सीए अभिजित केळकर, पश्चिम क्षेत्रीय सदस्य, आयसीएआय.
पायाभूत सुविधावर भर हे चांगले द्योतक ()
प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराबाबत विशेष बदल न करता जलसंधारण, रस्ते, रेल्वे आणि पायाभूत सुविधांवर खर्च करण्यावर भर दिलेला आहे. भांडवली खर्चासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ३४ टक्के वाढ केली आहे. सीमा शुल्क कमी केल्याने छोट्या उद्योगांसाठी कच्च्या मालाच्या किमती कमी होतील. नागपूर व नाशिक मेट्रोसाठी तरतूद उत्तम आहे.
सीए मिलिंद कानडे, उपाध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.