बेला येथील घटना : अंदाजे सहा लाखांचे नुकसानबेला : स्थानिक वॉर्ड क्रमांक- ५ मधील आनंदराव घुमडे व ईश्वर घुमडे यांच्या गोठ्याला रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग नियंत्रणात येईपर्यंत दोन्ही गोठ्यांमधील गुराचा चारा व इतर शेतीपयोगी साहित्य खाक झाले. यात अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी दिली. गावालगत आनंदराव घुमडे व ईश्वर घुमडे यांचा गोठा आहे. या दोन्ही गोठ्यांचे पक्के बांधकाम करण्यात आले आहे. या गोठ्यात जनावरांचा चारा साठविण्यात येत असून, संपूर्ण शेतीपयोगी साहित्य तिथे ठेवले जाते. शिवाय, गुरेही बांधली जातात. आनंदराव घुमडे सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास गोठ्यातून घरी निघून गेले होते. दरम्यान, सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या गोठ्याला आग लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. ही आग ईश्वर घुमडे यांच्या गोठ्याला लागली. त्यात सागवान फाटे, टिनपत्रे, कवेलू, कडबा, कुटार, शेतीची अवजारे, स्प्रिंकलर सेट, पीव्हीसी व लोखंडी पाईप, स्प्रे पंपसह इतर साहित्य जळाले. ही आग गंगाधर घुमडे व विष्णू घुमडे यांच्या गोठ्याला लागणार असल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत आनंदराव घुमडे व ईश्वर घुमडे यांच्या गोठ्यातील बहुतांश साहित्य जळाले होते. यात आनंदराव घुमडे यांचे अंदाजे ३.५० लाख व ईश्वर घुमडे यांचे अडीच लाखांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाचे उल्हास ढाकणे, विठ्ठल उरकुडे, रजत सोमवंशी, योगेश लांडे, देवराव बालपांडे यांच्यासह गजानन कोल्हे, दिलीप मुळे, संजय सेलकर, उमेश उरकुडेसह अन्य तरुणांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी धडपड केली. या दोन्ही शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
गोठ्याची राखरांगोळी
By admin | Updated: April 25, 2016 02:57 IST