निशांत वानखेडे नागपूर कोणत्याही शहरातील नागरिकांनी स्मार्ट झाल्याशिवाय स्मार्ट सिटीची कल्पना शक्य नाही. स्मार्ट सिटीच्या संकल्पनेला मोबाईल अॅपसारख्या तंत्रज्ञानाची जोड नागपूरच्या तरुण अभियंत्यांनी दिली आहे. प्रशासनाला या अॅपशी जोडल्यास नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविणे शक्य होईल, असा विश्वास या तरुणांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. केतन पैठणकर, सागर घोंगे आणि प्रतीक चांद्रायण या तिघांसोबत इतर पाच तरुणांच्या टीमने ‘रिचो’ नावाचे हे अॅप निर्माण केले आहे. केतन याने अमेरिकेच्या विचीता स्टेट विद्यापीठात आणि प्रतीक याने मिशीगन विद्यापीठातून अभियांत्रिकीची मास्टर्स डिग्री संपादन केली आहे तर सागर याने आयआयटी पवई(मुंबई) येथे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. बहुतेक नागरिकांजवळ आज स्मार्ट फोन आहे. वॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल साईट अॅपवर त्वरित प्रतिक्रिया देणाऱ्यांचे हे जग आहे. शहरातील नागरिकांजवळ असेच एखादे अॅप असावे. हे अॅप प्रशासकीय यंत्रणेशी जोडले असावे आणि नागरी समस्येबाबत प्रशासनाकडून त्वरित प्रतिक्रिया(क्विक रिस्पॉन्स) मिळाली तर, याच विचारातून या अॅपची निर्मिती करण्यात आल्याचे केतन पैठणकर याने सांगितले. विशेष म्हणजे केवळ समस्याच नाही तर, न्यूज, आपले विचारही रिचो अॅपवर पोस्ट करु शकत असल्याचे प्रतीक चांद्रायण याने सांगितले. हे अॅप पूर्णपणे त्या शहरातील नागरिकांसाठीच असून २५ किलोमीटरच्याच रेंजमध्ये सुरू राहणार असल्याचेही प्रतीकने स्पष्ट केले. नागरिकांना शहरातील घडामोडीबाबत अपडेट ठेवण्याचे काम हे अॅप करणार असल्याचे प्रतीकने सांगितले.
स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट अॅप ‘रिचो’
By admin | Updated: November 27, 2015 03:08 IST