श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती : युवकांसह वृद्धांचाही सहभाग नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी नागपुरात शेकडो नागरिकांनी रक्तदान करून बाबूजींना आदरांजली वाहिली. बाबूजींनी सातत्याने समाजासाठी काम केले आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य केले. त्यांची जयंती साजरी करताना सामाजिक जाणिवेतून आज शेकडो नागरिकांनी रक्तदान करून बाबूजींना आदरांजली अर्पण केली. लोकमत भवनातील ‘बी’ विंग ११ व्या माळ्यावर आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाले. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रणजितसिंग बघेल यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. हे शिबिर लोकमत परिवार आणि लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अप्रायसेस सेंटरच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी लोकमतचे संचालक परिचालन अशोक जैन, लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरात तरुणांसोबतच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. एक सामाजिक जाणीव म्हणून लोकमतचे वाचक, कर्मचारी, युवा नेक्स्टचे सदस्य व सखी मंच सदस्यांनी शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. १८ ते ६० वर्षांपर्यंतच्या दात्यांनी यावेळी रक्तदान करून सामाजिक ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न केला. सकाळी १०.३० वाजतापासून सुरू झालेल्या या शिबिरात सायंकाळपर्यंत रक्तदात्यांची गर्दी होती. यावेळी रक्तदात्यांना रक्तदान कार्ड, प्रमाणपत्र, प्रथमोपचार देण्यात आले. शिबिरात रक्तदात्यांना रक्तगटाची तपासणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन सखी मंच संयोजिका नेहा जोशी यांंनी केले. शिबिरासाठी लाईफ लाईन रक्तपेढीचे डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. लोकमत परिवाराच्यावतीने सर्व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले. शिबिरात अनेक महिला आणि मुली रक्तदानासाठी पुढाकाराने आल्या होत्या. यातील अनेकांचे हिमोग्लोबिन कमी असल्याने त्यांना रक्तदान करता आले नाही. पण यानंतर पुढील वर्षी हिमोग्लोबिन योग्य स्थितीत ठेवण्याची काळजी घेऊन रक्तदान करण्याचा निश्चय महिलांनी व्यक्त केला. लोकमतच्या शिबिरात रक्तदान करताना विश्वास वाटतो, असे मत यावेळी रक्तदात्यांनी व्यक्त केले. लोकमतच्या माध्यमातून केले जाणारे रक्तदान योग्य आणि गरजू रुग्णांपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही यावेळी रक्तदात्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)रक्तदानातूनच सामाजिक सेवेचा प्रयत्न वयाची ६० वर्षे पूर्ण केलेले आणि एका पायाने अपंग असलेले सुनीलकुमार माणिकराव शहाणे यांनी शिबिरात रक्तदान केले. शहाणे म्हणाले, १ जुलै रोजी माझा वाढदिवस असतो; पण दरवर्षी मी बाबूजींच्या जयंतीलाच रक्तदान करतो. गेल्या १३ वर्षांपासून मी बाबूजींच्या जयंतीनिमित्त येथे रक्तदान करतो आहे. हे माझे ४६ वे रक्तदान आहे. कोराडीला १९९६ साली माझा अपघात झाला. या अपघातात डावा पाय कापावा लागला. अपंगत्वामुळे आता समाजासाठी फार काम करता येत नाही; पण रक्तदान करून सामाजिक ऋण फेडण्याचा माझा प्रयत्न आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झाली. यानंतरही मला रक्तदान करता आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आता रक्तदानाची भीतीच गेलीपूर्वी रक्ताचा थेंब पाहिला तरी माझा थरकाप उडायचा. त्यामुळे रक्तदान सोडा साधे इंजेक्शन घेण्याचीही भीती वाटायची. पण आई प्रतिभा हिने माझी भीती दूर केली. दोन वर्षांपूर्वी लोकमतने आयोजित केलेल्या श्रद्धेय बाबूजींच्या जयंतीनिमित्त असलेल्या रक्तदान शिबिरात मी पहिल्यांदाच रक्तदान केले होते. त्यानंतर आज पाचव्यांदा रक्तदान केले. आता रक्तदानाची भीती गेली. एका नातेवाईक रुग्णाला रक्ताची नितांत गरज होती. त्यावेळी रक्त मिळविण्यासाठी खूप पायपीट करावी लागली. त्यामुळे रक्तदानाचे महत्त्व कळले, पण मनात भीती होती. आईने मात्र माझ्यात हिंमत जागविली. याप्रसंगी ऋतुजा राजकारणे या युवतीसह तिची आई प्रतिभा राजकारणे यादेखील उपस्थित होत्या.
सामाजिक जाणिवेतून शेकडोंनी केले रक्तदान
By admin | Updated: July 3, 2014 01:03 IST