नागपूर : राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होताच नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने आठवीपर्यंतच्या सुरू झालेल्या शाळा बंद कराव्या, असा बालरोग तज्ज्ञांचा सूर होता.
अॅकेडमी ऑफ पेडिायट्रिक्सच्यावतीने बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विजय धोटे तर सचिव डॉ. पंकज अग्रवाल यांच्यासह डॉ. अविनाश गावंडे, डॉ. मराठे, डॉ. वसंत खळतकर, डॉ. जयंत उपाध्याय, डॉ. संजय पाखमोडे, डॉ. संजय देशमुख व डॉ. योगेश पापडे आदी उपस्थित होते.
कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच काळात माध्यमिक शाळा सुरू आहेत. पाचवी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी कोरोना चा धोक्याबाबत गंभीर राहत नाही. यामुळे त्यांच्याकडून मास्कचा वापर, शारीरिक अंतर, सॅनिटायझरचा वापर होईलच असे नाही. परिणामी, त्यांच्यामध्ये कोरोनाचा धोका वाढू शकतो. यामुळे तूर्तास तरी आठवीपर्यंतच्या शाळा नको, असे तज्ज्ञांचे म्हणणे होते.
-विद्यार्थ्यांमध्ये वाढले मोबाईलचे व्यसन
लॉकडाऊनमध्ये मुले घरीच होती. यातच शाळेचे ऑनलाईन वर्गाला सुरूवात झाल्याने अनेकांच्या हातात मोबाईल आले. सुरुवातीला त्यांच्या हातातील मोबाईलकडे पालकांचे लक्ष होते. परंतु नंतर त्याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे मुलांमध्ये मोबाईलच्या व्यसनासोबतच पोर्नाेग्राफी पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. पालकांनी पुढील धोका ओळखून मुलांशी मैत्री वाढवावी. चांगल्या वाईट परिणामाची माहिती द्यावी. शक्य झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.