जागतिक आदिवासी अस्मिता दिन : मधुकरराव पिचड यांचे प्रतिपादन नागपूर : आदिवासी समाज आज आपल्या अस्मितेसाठी लढा देत आहे. त्यांच्या बोलीभाषा काळानुरूप नष्ट होत आहेत. म्हणून त्यांचे संवर्धन व जतन व्हायला हवे. असे झाले तरच आदिवासी समाज स्पर्धेच्या काळात तग धरू शकेल, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभाग नागपूरच्यावतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार आशिष जयस्वाल, विधान परिषदेचे आमदार प्रकाश गजभिये, जयप्रकाश गुप्ता, नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माळीण येथील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पिचड म्हणाले, आदिवासी संस्कृती ही अतिशय समृद्ध असूण सण, प्रथा, परंपरा, नृत्य, भाषा, गीते, नृत्यकला इत्यादी म्हणजे आदिवासी संस्कृतीचा वारसा होय. यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. यावेळी १० वी व १२ वी मध्ये प्राविण्यप्राप्त मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्या आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के लागला त्या शाळेतील मुख्याध्यापकांचाही सत्कार करण्यात आला. आदिवासी विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण घेऊन वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, सांस्कृतिक कला, वसतिगृहातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आदिवासी विकास अप्पर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी भूमिका विशद केली. संचालन रेणुका देशकर यांनी केले. तर प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
बोलीभाषेचे संवर्धन करा!
By admin | Updated: August 10, 2014 01:29 IST