काटोल : वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या वतीने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व लहान-मोठी दुकाने आठही दिवस बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. कडब निर्बंधाच्या नावावर संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचे, दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गतवर्षी लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका छोट्या व्यापाऱ्यांना बसला आहे. आता गाडी रुळावर येत असताना पुन्हा कडक निर्बंधाच्या नावावर अघोषित लॉकडाऊनचा फटका व्यापाऱ्यांना बसतो आहे. याबाबत सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी काटोल व्यापारी संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांना व्यापारी संघाच्या वतीने यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात अध्यक्ष भरत पटेल, उपाध्यक्ष गोपाल गुप्ता, कपिल आंबीलकर, सचिव पुष्पदंत ढोपाडे, कोषाध्यक्ष तुषार घोडे, सदस्य विजय हजारे, दीपक उपाध्याय, प्रशांत बाबूळकर, चंदू गायकवाड, विनोद वर्मा, तालिबभाई मिर्झा, कृष्णा रेवतकर, देवीदास मदनकर, प्रवीण गोतमारे, सागर पुंड, दिलीप घारड, राजू डंभाळे, पुनीत तेलते, जयंत तेलते, विशाल सावरकर, आनंद गायकवाड यांचा समावेश होता.
निर्बंधाबाबत फेरविचार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:09 IST