विश्वास कुळकर्णी महाराज : कीर्तन महोत्सवनागपूर : शास्त्राचे केवळ वाचन करणे पुरेसे नाही तर ते आचारणात आणावे लागेल. श्रीकृष्णाच्या भगवतगीतेमध्येदेखील कर्मयोगाबरोबरच आपल्या हक्कासाठी, विजयासाठी लढण्याची शिकवण दिली आहे. शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टींची समाजाला आवश्यकता आहे. आपल्या देवतांनी देखील दुर्जनांचा सामना करण्यासाठी शस्त्र हाती घेतले होते. त्यामुळे आपणही समाज कंटकांच्या विरोधात संघटित होऊन आवाज उठविण्याची गरज आहे, असे मत कीर्तनकार विश्वास कुळकर्णी महाराज यांनी व्यक्त केले.संवेदना परिवार संस्था व पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रामनगर येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात आयोजित कीर्तन महोत्सवात दुसरे पुष्प पुणे येथील विश्वास कुळकर्णी महाराज यांनी गुंफले. या वेळी कुळकर्णी महाराज म्हणाले, ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याची गरज ओळखून ३८ व्या स्वातंत्र्य संमेलनाचे अध्यक्ष असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी साहित्यिकांना ‘लेखण्या मोडा आणि शस्त्र हाती घ्या’ असे म्हटले होते. तर, मानवाने कसे जगावे याची नियमावली म्हणजे शास्त्र होय. मात्र, शस्त्र हाती घेण्याची शिकवण जर दिल्या जात नसेल तर ते शस्त्र काय कामाचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संतांची बाह्य व आंतर लक्षणे उलगडून सांगत असतानाच त्यांनी देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या चाफेकर बंधू यांची शौर्यगाथा विषद केली. वासुदेव बळवंत फडके यांनी मातृभूमीसाठी दिलेल्या बलिदानाच्या बातमीने प्रेरित होऊन चाफेकर बंधू यांनी देश सेवेचा ध्यास घेतला. टिळकांसोबत मिळून पुढे गणेशोत्सव व शिवजयंती महोत्सव सुरू केला. देशप्रेमापोटी चाफेकर बंधू फासावर चढले, असेही त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न देऊन त्यांच्या देशसेवेचा गौरव करावा, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, आ. डॉ. मिलिंद माने, संजय भेंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
समाजकंटकांच्या विरोधात आवाज उठवा
By admin | Updated: November 22, 2015 03:09 IST