नागरिकांची तारांबळ : उकाड्यापासून दिलासा
नागपूर : नागपुरातील मे महिना म्हणजे उन्हाचा तडाखा. वर्षभर वाळवून ठेवण्यात येणारे पापड, शेवया आदी करण्याचा कडकडीत उन्हाचा महिना म्हणजे मे महिना. पण यंदा मे महिन्यात उन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्याचा अनुभव गेले काही दिवसांपासून नागपूरकर घेत आहेत. दुपारी रणरणते उन पडले असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक आकाशात ढगांची गर्दी व्हायची आणि पावसाचे काही थेंब पडायचे. पण आज बर्यापैकी पावसाने हजेरी लावून नागपूरकरांना उकाड्यापासून दिलासा दिला. आजचे दिवसाचे तापमान कमाल ४२ अंश सेल्सिअस होते. हे तापमान सरासरीपेक्षा एका अंशाने कमी तर किमान तापमान २८. ८ अंश सेल्सिअस होते. किमान तापमानात सरासरी एका अंशाची घट होती. दिवसभर नागरिक उकाड्याने हैराण झाले असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक काळे ढग आकाशात दाटून आले. शहराच्या काही भागात जवळपास १० मिनिटे वादळी वार्यासह पाऊस कोसळला. त्यानंतर वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला. त्यानंतर रात्री ८.४५ च्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. रस्त्यावरून जाणार्या नागरिकांनी या पावसाची फारशी तमा बाळगली नाही. कारण हा पाऊस चिंब करेल असे वाटलेच नाही. पण अचानक पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि नागरिकांना आडोशाला थांबण्याशिवाय पर्याय उरला नाही. रस्ते ओले झाल्यावर पावसाने मात्र काढता पाय घेतला. रात्री ८. ३० वाजेपर्यंत शहरात ३. १ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. थोडा वेळ आलेल्या पावसाने रात्री शहरात गारवा निर्माण केला. उद्या बुधवार दि. २१ मे रोजी सामान्यत: आकाश निरभ्र राहील आणि पाऊस येणार नसल्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)