चंद्रशेखर बावनकुळे : जवळीच्या समाधान शिबिरात ८५०० प्रमाणपत्रांचे वाटपभिवापूर : तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या एकूण ३८ नळ योजना कार्यान्वित असूप, सहा गावांमध्ये नळ योजना नाही. यापुढे सर्व गावांमधील नळ योजनांना सोलर पंप लावण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.भिवापूर तालुक्यातील जवळी येथे शनिवारी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. या शिबिरात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या एकूण ८५०० प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले असून, ६७६ शेतकऱ्यांना ६ कोटी ३८ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी आ. सुधीर पारवे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी भगत, आनंद राऊत, नंदा नारनवरे, दीपाली इंगोले, योगिता चिमूरकर उपस्थित होते.यावेळी परिसरातील २२ गावांमधील सरपंच व उपसरपंचांनी पाणीटंचाई, रस्त्यांची दुरुस्ती, पांदण रस्ते, वीज दुरुस्ती, ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी इमारत, स्मशानघाट यासह अन्य समस्या मांडल्या. महावितरणच्या पायाभूत आराखडा - २ च्या कामांचा आढावाही घेण्यात आला. या सर्व समस्या तीन महिन्यांत सोडवाव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने त्यांनी केलेली काम सादर केली. त्यात २५ रस्त्यांचे सिमेंटीकरण व ४६ रस्त्यांची कामे पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. कृषिपंपासाठी नवीन कनेक्शन देण्याचे काम आॅक्टोंबर - २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. जलसंधारणाच्या कामावर जिल्हा नियोजन समितीतर्फे १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यातून जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढविण्याचा आपला प्रयत्न आहे. जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, कालव्यांचे पुनरुज्जीवन, पाणीपुरवठा योजना या कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी ओलितासाठी शेतात सोलर पंप लावावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले असून, यासाठी लागणारा ५० टक्के निधी शासन देणार असून, ५० टक्के खर्च शेतकऱ्याने करावयाचा आहे, असेही त्यांनी सांगितले. सोलर पंपामुळे नळ योजना व शेतकऱ्यांनी विजेच्या बिलातून मुक्तता होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी) सावकारी कर्ज माफकारगाव जिल्हा परिषद सर्कलमधील ७१२ कर्जदार शेतकऱ्यांना १ कोटी ५४ लाख रुपयांच्या सावकारी कर्जातून मुक्तता मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. यातील ६५ शेतकऱ्यांच्या सावकारांकडे तारण असलेल्या वस्तू परत देण्यात आल्या. राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेचा लाभ १९ लाभार्थांना मिळाला असून, या योजनेतून ३ लाख ८० हजार रुपये वितरित करण्यात आले. संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा व राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजनेचा लाभ २१७ कुटुंबांना मिळाल्याचे सांगण्यात आले. मोखाबर्डी उपसा सिंचन योजनातालुक्यातील मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेवर मार्च २०१६ पर्यंत १०७३.९८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. यंदासाठी या प्रकल्पाला ३६७ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहे. या योजनेच्या पंपगृहाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून झाले नाही. ते वेगाने पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
नळ योजनांना सोलर पंप लावा
By admin | Updated: June 5, 2016 02:48 IST