नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने जिल्ह्यातील ७२१ गावांचा समावेश असलेला नागपूर मेट्रो रिजन विकास आराखडा फेब्रुवारी २०१५ ला जाहीर केला. या आराखड्याच्या विरोधात जय जवान, जय किसान संघटनेतर्फे जिल्ह्यातील ३९१ गावात जनमत चाचणी घेतली. शुक्रवारी या जनमत चाचणीच्या मतमोजणीला संविधान चौकात सुरुवात झाली. जनमत चाचणीच्या माध्यमातून ग्रामीणमधील लाखो नागरिकांनी मेट्रोरिजनच्या आराखड्याला नकार देत तो रद्द करण्याची मागणी केली आहे. नागपूर मेट्रो रिजन आराखडा हा अन्यायकारक आहे किंवा नाही यावर डिसेंबर महिन्यात जय जवान जय किसान संघटनेतर्फे अभियान राबविण्यात आले. संघटनचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात ३९१ गावांमध्ये जनमत चाचणी घेतली. शुक्रवारी संविधान चौकात मतमोजणीला जाहीरपणे सुरुवात झाली. या वेळी मतमोजणीला प्रशांत पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, डॉ. शरद निंबाळकर आदी उपस्थित होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील कामठी, नागपूर ग्रामीण, सावनेर, उमरेड, कळमेश्वर, पारशिवनी व कुही तालुक्यातील २२६ गावातील मतमोजणी पूर्ण झाली होती. यात ३ लाख १० हजार ५०६ मतदारांपैकी २ लाख ६६ हजार ६६ मतदारांनी मेट्रोरिजनचा आराखडा अन्यायकारक आहे असा कौल दिल्याचे दिसून आले. मतमोजणीत नरेंद्र पलांदूरकर, अरुण वनकर, विजयकुमार शिंदे, प्रवीण राऊत, डॉ. नेहा पलांदूरकर, किशोर चोपडे, रुद्रेश कापगते, सागर हिंगवे, शरद खेडीकर, राजेश तरार, समर शेख, मिलिंद महादेवकर, गंगाराम खेडकर, सागर खानोरकर, प्रकाश डोंगरे, मोतीराम रहाटे, पंकज कोंगे आदींनी भाग घेतला. मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालणार असून अंतिम निकाल शनिवारी सकाळी जाहीर केला जाणार आहे. संघटनेने यापूर्वीही मेट्रो रिजन आराखड्याच्या विरोधात जनजागृती मोहीम राबविली. खुली जाहीर सुनावणी घेतली. हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर मोर्चा काढला होता.
मेट्रो रिजन विरोधात जनमताचा कौल
By admin | Updated: January 23, 2016 03:07 IST