नागपूर : तोतलाडोह व बावनथडी प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला तात्काळ देण्यात यावा, याबाबत २७ मार्चपर्यंत सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी संबंधितांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, पाटबंधारे व जलसंपदा विभागाचे अभियंता, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
भूधारक शेतकऱ्यांच्या नाव, सातबाराच्या नोंदी, जमिनीचे दर, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मोबदला जमा झाल्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे केदार म्हणाले. शासनाच्या रकमेची सर्व जबाबदारी महसूल विभागाची आहे. २७ मार्चपर्यंत सर्व माहिती सादर करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला मिळाला पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले. कुसदावासीयांना घराची रक्कम तात्काळ मिळवून देत नागरी गावात पायाभूत सुविधेपासून उपलब्ध करून देण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी सांगितले असता, त्यावर कुसदा क्र. १ व २ या गावाचे एक कोटीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश केदार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. आदिवासीबहुल गाव असल्याने त्यांना नागरी सुविधा द्या. तोतलाडोह आव्हानात्मक विषय आहे. तो सोडविण्यासाठी संयुक्तिक काम करावे लागणार आहे. तसेच या प्रकल्पांतर्गत इतर गावांनासुद्धा नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बॉक्स
भूदान जमिनीबाबत दहा वर्षातील व्यवहाराची माहिती द्या
भूदान ही विनोबा भावे यांची चळवळ असून ती एक विचारधारा आहे. भूदान जमीन इतरांना विक्री करता येत नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षात किती जमिनीचे पट्टे विक्री करण्यात आल्याची माहिती भूदान मंडळाला सादर करण्याचे निर्देश केदार यांनी दिले. जमिनीबाबतची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा अहवाल सादर करत ती नगर परिषदकडे वर्ग करण्याचे त्यांनी सांगितले. सर्व सेवा संघाद्वारे भूदान मंडळास शिफारस करून मंडळाची स्थापना होते. त्यामुळे भूदान केलेल्या व्यक्तींची यादी व भूदान मंडळाच्या ११ सदस्यांची यादी तात्काळ सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले.