शिलेदारांच्या पुतळ्यांची दुरवस्था
नागपुरातील १९२० चे राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन स्वातंत्र्याच्या लढाईत अतिशय महत्त्वपूर्ण ठरले. नागपूरसह विदर्भातील अनेक काँग्रेस नेत्यांनी दिवस-रात्र राबून हे अधिवेशन यशस्वी केले. आयोजनाच्या दृष्टीनेसुद्धा हे अधिवेशन ‘न भूतो न भविष्यति’ ठरले. परंतु हे ऐतिहासिक अधिवेशन यशस्वी करणाऱ्या त्या शिलेदारांना मात्र त्यांच्या राजकीय पक्षासह नागपूरकरही विसरले. तसे पाहिले तर गेल्या १०० वर्षात शहरातील अनेक रस्ते व वस्त्यांना यापैकी काही शिलेदारांची नावे मिळाली. काहींचे पुतळेही उभारल्या गेले. परंतु आज त्यांच्या या पुतळ्यांकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही. अधिवेशनासाठी स्थापन झालेल्या स्वागत समितीचे अध्यक्ष सेठ जमनालाल बजाज, महासचिव डॉ. बा. शि. मुंजे, सदस्य एम.आर. बोबडे व एम.व्ही. अभ्यंकर यांच्या पुतळ्यांची अशीच अवस्था आहे. या पुतळ्यांवर सर्वत्र धूळ पसरली आहे. अभ्यंकर यांच्या पुतळ्याला जागोजागी तडे गेले आहेत. बजाज यांच्या पुतळ्याची रेलिंग तुटली आहे. सर्वत्र धूळ पसरली आहे. मुंजे यांच्या पुतळ्याची परिस्थती तर याहून दयनीय आहे. येथील परिसर सध्या पार्किंग व मेट्रो रेल्वेचे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी वापरले जात आहे.