वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन
- दीड महिन्यात १ लाख २१ हजार वाहनधारकांवर कारवाई
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कितीही जनजागरण करा, समुपदेशन करा किंवा दंडाच्या रूपाने कानटोचणी करा. बेशिस्त वाहनधारक ‘हम नही सुधरेंगे’चा हेका धरून आहेत. अवघ्या दीड महिन्यात उपराजधानीतील १,२०, ८८२ वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांची खिल्ली उडविली. यावरून त्याची प्रचिती यावी.
शहर अपघातमुक्त व्हावे. कुणालाही दुखापत होऊ नये. कुणाचे नुकसान होऊ नये म्हणून वाहतूक शाखेचे पोलीस प्रयत्नशील असतात. प्रत्येक वाहनचालकाने शिस्त बाळगावी अशी अपेक्षा असते. मात्र, तसे काही होणे शक्य नाही. जोपर्यंत पोलिसांचा दंडुका पडत नाही किंवा कारवाईच्या रूपातील चालान पावती हातात पडत नाही, तोपर्यंत अनेक वाहनधारक ठिकठिकाणी बेशिस्तीचे प्रदर्शन करताना घुमतात. सर्वच वाहनचालक बेशिस्तच असतात असे नाही अन् प्रत्येक जण वाहतुकीच्या नियमाचे पालन करीत नाही, असेही नाही. अनेक जण वाहतुकीचे नियम पाळतात. मात्र, अशांची संख्या फारच कमी आहे. याउलट वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची कशी स्पर्धा लागली, ते रोज चौकाचाैकात बघायला मिळते.
उपराजधानीत १ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत १,२०, ८८२ वाहनधारकांवर वेगवेगळ्या कारणावरून वाहतूक पोलिसांनी चालान कारवाई केली. त्यावरून बेशिस्तीचे प्रदर्शन करणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे, त्याचा प्रत्यय येतो.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्ये सर्वच वयोगटातील मंडळीचा समावेश आहे. त्यात दारुड्यांची संख्या ५३,०१६ आहे. त्यानंतर मुले, मुली अन् महिलाही रेड सिग्नल असूनही वाहने दामटताना दिसतात. रोज सरासरी दोन हजार वाहनचालक सिग्नल तोडताना दिसतात.
----
१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीतील सिग्नल जम्प, ओव्हरस्पीड, ट्रिपलसीट आणि राँग साईडच्या कारवाईचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
सिग्नल जम्पिंग - ६,९०४
ओव्हरस्पीड - २,६२८
ट्रिपलसीट - ०८४६
राँग साईड - ०५५६
----------------
१०, ९३४