पोलिसांविरूद्ध तक्रार : भूसुरूंग स्फोट झालेल्या मुतनूरच्या कोंदामी यांचा राजीनाम्याचा इशारा
गडचिरोली : ११ मे रोजी चामोर्शी तालुक्यातील मुतनूर गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट केला होता. यात सात पोलीस जवान शहीद झाले. या घटनेनंतर चामोर्शी पोलिसांनी मुतनूरचे पोलीस पाटील रामजी कोंदामी यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या संदर्भात कोंदामी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही दाखल केली आहे. या तक्रारीत पोलीस पाटील रामजी सोमा कोंदामी यांनी म्हटले आहे की, मागील २० ते २५ वर्षांपासून मुतनूर गावचा पोलीस पाटील म्हणून काम करीत आहे. या बाबतची सविस्तर माहिती त्यांनी पत्रकारांनाही परिषदेतही दिली. १५ मे २०१४ रोजी मी व इतर गावातील पोलीस पाटील चामोर्शी पोलीस ठाण्यात बैठकीसाठी गेलो. बैठक संपल्यानंतर मला व इतर गावातील पोलीस पाटील यांना उपविभागीय पोलीस अधिकारी चामोर्शी यांनी नक्षलवाद्यांबाबत विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर मला एका खोलीमध्ये नेऊन पट्ट्याने उपविभागीय अधिकार्यांच्या सांगण्यावरून जाधव नामक अधिकार्याने हातावर, पायावर, तळपायावर व माझ्या अंगावरचे कपडे काठून काठीने पाठीवरही मारहाण केली व या मारहाणीबाबत कुठेही तक्रार करण्यास मनाई केली आहे. माझ्या गावातील किती लोकांकडे मोटारसायकल आहे. त्यांची नावे माझ्याकडून लिहून घेतली. माझा कोणताही गुन्हा नसताना उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून आपल्याला न्याय द्यावा, अन्यथा पोलीस पाटील पदाचा आपल्याला राजीनामा द्यावा लागेल असेही रामजी कोंदामी यांनी म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)