लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात जे काही आरोप होत आहेत, त्यावर आमचे लक्ष आहे. या प्रकरणात चौकशी होईल, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. चौकशीअंती सत्य बाहेर येईलच. त्यामुळे तोपर्यंत यासंदर्भात कुठल्याही नेत्यावर दोषारोप करणे योग्य नाही. मात्र, पोलीस त्यांचे काम नियमानुसार करतील. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही, असा दावा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यात तीन पक्षांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. हा निर्णय योग्य असल्याचे जनतेला कळून आले आहे. मुख्य म्हणजे भाजपाला देश चालविता येत नाही. त्यांच्या सरकारचे निर्णय देशहितासाठी घातक आहेत, असा आरोप थोरात यांनी केला. महाविकास आघाडीतील मंत्री एकत्र बसून जनतेच्या हिताचे निर्णय घेतात. दर मंगळवारी तिन्ही पक्षांचे मंत्री अजित पवार, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेत असतात. सर्व निर्णय जनतेच्या हितासाठीच असतात. एका प्रश्नाच्या उत्तरात थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षात सोनिया गांधी जे निर्णय घेतात, ते सर्वांना मान्य असतात. राहुल गांधी उत्कृष्ट काम करीत आहेत. त्यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष बनावे, अशी व्यक्तिगत इच्छा आहे. शरद पवार वरिष्ठ नेते आहेत. त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहे. महाविकास आघाडीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
भाजपा परत कधीच सत्तेत येणार नाही
आरशात पहा, पुढच्या विरोधी पक्षाचा नेता दिसेल, असे मी कोल्हापूरच्या सभेत म्हणालो होतो. मी पुन्हा येईन, हे तर दूरच, राज्यात भाजपा सत्तेत कधीही येणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.