रस्त्यांचे नुतनीकरण, ही भौतिक विकासात्मक धोरणात पहिली पायरी मानली जाते. गेल्या काही वर्षापासून याच पायरीवर शहरात युद्धस्तरावर काम सुरू आहे. मात्र, कितीही विकासकामे केली तरी पावसाळ्यात पितळ उघडे पडतेच, हा दरवर्षीचा अनुभव आहे. पूर्व नागपुरातील जुना भंडारा रोड व पारडी येथे सुरू असलेल्या उड्डाण पूल व महामेट्रोच्या रस्त्यावर असे मोठमोठाले खाचखळगे दिसून येतात. एरवी हे खड्डे दिसत असल्याने वाहन चालक गर्दीतही स्वत:ला सावरतात. मात्र, पावसात सावरायचे कसे, हा प्रश्न दुचाकी चालकांनाच नव्हे तर जड वाहनांनाही पडतो. बुधवारी पहाटेपासून दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यात या ठिकाणी रस्त्यावरचे पाणी बाहेर पडण्याचा मार्गच नसल्याने तलावसदृश स्थिती झाली होती तर काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांच्या तीव्रतेचा अंदाजच येईना. विशेष म्हणजे, या रस्त्याशेजारीच डीसीपी झोन पाचचे कार्यालयही आहे. ही समस्या म्हणावी की संकट. मात्र, प्रशासनाला दिसत नाही, ही वेदना आहे.
छायाचित्र - मुकेश कुकडे
.............