नागपूर : लेखनाची वैचारिक बैठकच नष्ट होत असेल तर ती गंभीर आणि चिंतेची बाब असून, अविवेकी लोकांची जमात वाढत चालल्याचे आणि विचारवंतांची जात संपत चालल्याचे ते लक्षण आहे. विचारच संपत चालल्याची प्रक्रिया वेगवान होत असल्याचेही ते लक्षण आहे. असा वैचारिकदृष्ट्या कुपोषित समाज लोकशाहीसाठी गंभीर धोका निर्माण करीत आहे, असा विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा. शैलेंद्र लेंडे यांनी व्यक्त केला. मराठीतील वैचारिक लेखनाचे काय झाले? या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.प्रगतिशील लेखक संघ आणि धरमपेठ राजाराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत मनोहर तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुनीती देव, डॉ. इंद्रजित ओरके उपस्थित होते. हा परिसंवाद राजाराम वाचनालय, धरमपेठ येथे पार पडला. डॉ. सुनीती देव म्हणाल्या, मराठीतील सर्व वाड्मय प्रकार आणि कलांचा पाया वैचारिक बाजूंनी समृद्ध आहे. यासंदर्भातली अनेक उदाहरणे त्यांनी दिली.विचार करायला प्रवृत्त करते ते वैचारिक लेखन, अशी वैचारिकतेची व्याख्या त्यांनी केली.डॉ. इंद्रजित ओरके म्हणाले, मराठीला वैचारिक लेखनाची समृद्ध परंपरा आहे. ही परंपरा परिवर्तनवादी, प्रबोधनकारी, मार्क्सवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी यांच्यात विखुरली आहे. पण विशिष्ट धर्माधिष्ठित बाबींच्या प्रभावाखाली मराठी लेखनाने ही परंपरा पंगू केल्याचे आता जाणवते आहे. त्यामुळेच प्रागतिक विचारांच्या हाती राजसत्ता येत नाही.यासाठी नव्या वैचारिक प्रबोधनाची नितांत गरज आता निर्माण झाली आहे. साहित्य संस्थांचे कार्यही फारसे आशादायी नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, मराठी भाषा समृद्ध व्हायची असेल तर सध्याची स्थिती बदलून मराठीत वैचारिक आणि सैद्धांतिक लेखन मजबुतीने झाले पाहिजे. वैचारिक ग्रंथांची निर्मिती न होणे ही चिंतेची बाब आहे. विचारवंतांना पचविण्याची सवय समाजाला त्यासाठी लागली पाहिजे.विचारच करता न येणे हा लोकांचा खरा प्रश्न आहे. भारतातली तरुण पिढी हा विचार करू शकते पण तो केला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे संचालन प्रसेनजित गायकवाड यांनी तर आभार प्रकाश दुलेवाले यांनी मानले. (प्रतिनिधी)
लोकांना विचार करण्यापासून रोखले जातेय
By admin | Updated: May 9, 2014 02:20 IST