नागपूर : लग्नकार्य किंवा अन्य कारणांसाठी दागिने तयार केले जाणार असतील तर जास्त काळ वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. सोन्याचा भाव किती खाली जाईल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. सोन्याची ही चमक धोकाही देऊ शकते. आगामी काळात सोने भाव खाणार, यात शंका नाही. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीसाठी वाट पाहू नये. सोन्यात गुंतवणुकीची हीच संधी असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचे भाव उतरल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारे व्यापारी आणि सट्टेबाज यांचे त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. अक्षयतृतीयेपासून बाजारात प्रचंड गर्दी आहे. ग्राहकच नव्हे तर तोटा भरून काढण्यासाठी व्यापारीही सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये मध्यमवर्गीय व गृहिणींचे प्रमाण लक्षणीय आहे. सोन्याचे भाव उतरल्याने दागिन्यांची हौस पुरी करण्यासाठी खरेदी वाढल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागात व्यवसायावर परिणामभारतात होणारी सुमारे ७५ टक्के सोने खरेदी ही दागिन्यांच्या रूपात असते. त्यातही ५० टक्क्यांहून अधिक खरेदी ही गुंतवणुकीच्या उद्देशापोटीच केली जाते. भारताच्या बाबतीत लक्षात आलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भारतात होणाऱ्या सोने खरेदीतील ७० टक्के वाटा हा ग्रामीण भारताचा असतो. पण यावर्षी पावसाचा पिकांना फटका बसला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागात सराफा व्यवसायावर पडल्याचे सोने-चांदी ओळ कमिटीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कावळे म्हणाले, भारतीय व्यक्ती सोन्याच्या दागिन्यांकडे ते परिधान करण्याबरोबरच गुंतवणूक म्हणूनही पाहत असते. दागिन्यांची खरेदी ही काही केवळ अंगावर घालण्यासाठी किंवा केवळ मिरवण्यासाठी होत नाही. (प्रतिनिधी)
सोन्यात गुंतवणुकीची हीच संधी!
By admin | Updated: April 29, 2015 02:42 IST