आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या गतीने औद्योगिकीकरणाच्या गरजा बदलत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. सौरऊर्जेपासून इलेक्ट्रीक वाहनापर्यंत उत्पादने वाढली आहेत. यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने नुकतेच धोरण जाहीर केले आहे यात कंपन्यांच्या सहभागातून त्यांना गरजेनुरूप कौशल्य असलेली युवा पिढी घडविता येईल, असा विश्वास राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
कोशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून ‘आयटीआय’मध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी गुरुवारी चिटणवीस सेंटर येथे उद्योजकांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी लोढा बोलत होते. यावेळी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर, ॲडव्हांटेज विदर्भचे प्रेसिडेंट आशिष काळे, सहसंचालक योगेश पाटील, निखिल मुंडले, मीत्राचे समन्वयक विनयकुमार सोटे उपस्थित होते.
राज्य शासनाचे जवळपास ४१८ औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहेत. तर खाजगी क्षेत्रातील सहाशे आयटीआय आहेत. या संस्थांमार्फत दिले जाणारे प्रशिक्षण हे औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीप्रमाणे, गरजेप्रमाणे करावे लागेल ही वस्तुस्थिती आहे. ज्या काही त्रुटी आहेत त्या शासनाने समजून घेतल्या असून त्यावर मात करण्यासाठी आम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे खाजगी भागीदारीद्वारे अद्यावतीकरणाचे धोरण स्विकारले आहे. या धोरणाप्रमाणे आम्ही खाजगी उद्योग क्षेत्रांसोबत काम करण्यास उत्सुक असून कंपन्यांनी विश्वासाने पुढे यावे, असे आवाहन मंगल प्रभात लोढा यांनी केले.
मानवी कौशल्याची गुंतवणूक ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्याला पर्याय नसून त्यासाठीच शासनाने हे नवे धोरण आणले आहे. सर्वांनी एकत्र येवून आपण प्रयत्न केले तर कुशल मनुष्यबळाचा प्रश्न तात्काळ मार्गी लागेल असे कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले. यावेळी विदर्भातील उद्योजकांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी संवाद साधला. यावेळी औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. सहसंचालक किरण मोटघरे यांनी सर्वांचे आभार मानले.
आयटीआयमधील सुधार विलंबाने, सहा नवीन अभ्यासक्रमआयटीआयमध्ये यापूर्वीच सुधार विलंबाने सुरू झाला. आता आयटीआयचे आधुनिकरण सुरू असून नवीन कोर्सेस तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. नवीन शिक्षकांचीही भरती केली जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कार्यक्रमानंतर पत्रपरिषदेत दिली. आयटीआयमध्ये कृत्रिम प्रज्ञा (एआय), ईव्ही इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलार टेक्निशियन या नवीन अभ्यासक्रमांचा समावेश येत्या शैक्षणिक वर्षापासूनच होणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.