भिकाऱ्यांची व्यथा : दुकानदारांना चिल्लर देऊन घेतलेली पाचशेची नोट चालवायची कुठे?शफी पठाण : नागपूर अनवाणी पायांनी उपाशीपोटी दिवसभर शहर पालथे घातल्यावर पाच-पंचवीस रुपये गोळा व्हायचे. त्यातील पोटापुरते खर्च करून बाकीचे फाटक्या झोळीत बांधून ठेवायचे. पण, भिंतीच नसलेल्या घरात आभाळ पांघरून झोपणाऱ्या या दुर्दैवी जीवांना इतके चिल्लर पैसे सुरक्षित सांभाळणे कठीण व्हायचे अन् ते एखाद्या दुकानदाराला सोेपवून बंदी नोट घ्यायचे. यातूनच अनेक भिकाऱ्यांकडे पाचशेच्या नोटा गोळा झाल्या. पण, मायबाप सरकारच्या एका निर्णयाने या नोटांचे केवळ वैधत्वच संपवले नाही तर पै-पै जोडून आयुष्य कंठणाऱ्या भिकाऱ्यांनाही नव्याने भिकेला लावले आहे. भीक मागण्यावाचून निर्वाहाचा दुसरा पर्याय नाही आणि पर्यायाने इतर लोक उदार झाल्याखेरीज ज्याचं उदरभरण होणार नाही असा हा समाजाच्या लेखी सर्वात शेवटचा व कायम दुर्लक्षित घटक़ पण, याच दुर्लक्षित घटकाचा कालपर्यंत व्यावसायिकांना मोठा फायदा व्हायचा. सुट्या पैशांची बाजारात सदैव चणचण असते. अशा स्थितीत हेच भिकारी कामी यायचे. त्यांच्याकडचे सुटे पैसे ते दुकानदारांना देऊन बंदी नोट घ्यायचे. यातून शहरातील अनेक भिकाऱ्यांकडे पाचशेच्या नोटा गोळा झाल्या. परंतु आता हजार, पाचशेच्या नोटाच रद्द झाल्याने या भिकाऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. या नोटा बदलून मिळणार आहेत. परंतु त्यासाठी बँक खाते, ओळखपत्र आवश्यक आहे. येथे स्वत:चे नाव ज्यांना नीट आठवत नाही त्यांच्याकडे ओळखपत्र येणार तरी कुठून? लोकमतने शहरात फिरून इतरांच्या उदारतेवर जगणाऱ्या या लोकांचा आढावा घेतला तेव्हा ही विदारक स्थिती समोर आली. आयुष्य तर सारेच अधांतरी आहे. पण, दुर्दैवाने एखादे मोठे संकट कोसळलेच तर गाठीशी चार पैसे असावे म्हणून केलेली ही भविष्याची तरतूद एका रात्रीतून निव्वळ कचरा ठरली आहे. कुणाला सांगता येत नाही, सांगितले तरी कुणी ऐकणारे नाही...अशा विषण्ण अस्वस्थेत भिकाऱ्यांची ही जमात किंमतच गमावलेला नोटांचा हा ऐवज छातीशी कवटाळून नुसती रडत आहे. पण, इथे अवघे शहरच नोटा बदलण्यासाठी सलग धावत असताना कोपऱ्यातल्या या दुर्दैवी जीवांकडे पाहील तरी कोण हा खरा प्रश्न आहे.असे काहुन बदल्ले लोकं?टीबी वॉर्ड चौकात एका प्रेसवाल्याकडे चिल्लर देऊन बंदी नोट घ्यायला आलेली कुसुम आजी म्हणाली, पन्नास, शंभरचे चिल्लर बदलून नोट देत आहेत. पण, आता मोठ्या नोटेले किंमतच नाही म्हणतात. मंग अशी मोठी नोट फेकून द्याची का, असे काहुन लोकं बदल्ले बाप्पा, असा तिचा भाबळा सवाल होता. आभाळच कोसळलेकाही दिवसाआधीच चिल्लर बदलून दोन पाचशेच्या नोटा मिळवल्या होत्या. तेवढीच माझी संपत्ती आहे. पण, आता त्याही नोटा चालत नाहीत म्हणतात. हे ऐकून आभाळच कोसळले आहे. शरीर थकले, आयुष्य कधी दगा देईल सांगता येत नाही. पुन्हा इतके पैसे मिळवणे कठीण आहे, हे हताश शब्द आहेत यशवंत स्टेडियमखाली झोपणाऱ्या दुर्गाप्रसादचे.
नोटांचाही भार झाला फाटक्या झोळीस माझ्या!
By admin | Updated: November 17, 2016 03:00 IST