नागपूर : अख्ख्या मे महिन्यात दिवसाचे तापमान ४२ अंशाच्यावर गेले नाही. नवतप्यातही तापमान ४० अंशाच्या खालीच हाेते. पण आता सूर्यदेव मे महिन्याची कसर जूनमध्ये काढताे काय, असे वाटत आहे. रविवारी नागपूरचे तापमान तब्बल ३.५ अंशाने वाढून थेट ४३ अंशावर उसळले. त्यामुळे उकाड्यासाेबत उन्हाच्या चटक्यांनीही नागपूरकरांना हैरान केले.
रविवारी नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह तुरळक ठिकाणी किरकाेळ पाऊस हाेण्याचा हवामान विभागाचा अंदाज हाेता. मात्र आकाशात हलके ढग असूनही सकाळपासून सूर्याचा पारा वाढल्याची स्थिती हाेती. आकाशातील हे ढग सूर्याची तीव्रता राेखू शकले नाही. सूर्याचा ताप जरा अधिकच वाढल्याचे जाणवत हाेते. उलट ढगांमधून पावसाऐवजी उष्णता बरसत असल्याची आणि उन्हाचे चटके अंगाला झाेंबत असल्याची जाणीव हाेत हाेती. तापमान थेट ४३ अंशावर गेले. महिनाभरापासून सरासरीच्या खाली असलेला पारा सरासरीच्या पुढे गेला आहे. त्यामुळे लाेकांच्या शरीरातून अक्षरश: घामाच्या धारा वाहत राहिल्या. रात्रीचे तापमानही वाढून २८.४ अंशावर गेले असल्याने रात्रीचा उकाडासुद्धा वाढला आहे. सायंकाळच्या ५ वाजताच्या दरम्यान ढगांचा रंग बदलला व वादळाची स्थिती निर्माण झाली आणि शिंताेडे उडविल्यासारखा पावसाचा शिरवा आला. मात्र या पावसाने गारवा देण्याऐवजी उकाडाच जास्त वाढविला.
विदर्भात ४३.६ अंशासह ब्रम्हपुरी सर्वाधिक तापले हाेते. त्याखालाेखाल चंद्रपूर ४२ व गाेंदिया ४२.१ अंशावर गेले. अकाेला, अमरावती, वर्धा, भंडारा येथे तापमान ४१ अंशावर उसळले आहे. केवळ बुलढाणा ३३.४ व वाशिम ३६.८ अंशासह सरासरीच्या खाली आहेत. गडचिराेलीच्या सीमेवर थांबलेला पाऊस अजुनही त्याच ठिकाणी थांबून आहे. हवामान विभागाने पुन्हा आठवडाभर उन्हाचा व उकाड्याचा त्रास सहन करावा लागेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.