मुलाखत : सिनेपटकथाकार संजय पवार यांची लोकमतशी बातचीतसंतोष कुंडकर - चंद्रपूरमराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान नाही. त्यामुळे मराठी सिनेमा पाहिलाच पाहिजे, असे त्याला वाटत नाही. त्यामुळे मराठी सिनेमांच्या अधोगतीला मराठी माणूसच जबाबदार आहे, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात सिनेपटकथा तथा नाट्य लेखक संजय पवार यांनी व्यक्त केले.राज्य नाट्य स्पर्धेतील विजेत्या नाटकांच्या महोत्सवाला बुधवारपासून येथे प्रारंभ झाला. या महोत्सवासाठी येथे आलेल्या संजय पवार यांनी ‘लोकमत’शी बातचीत केली. मराठी सिनेमांना प्रेक्षक मिळत नाही, ही ओरड सातत्याने होते. त्याला असलेल्या अनेक कारणांपैकी भाषाभिमान हेदेखील एक कारण आहे. दक्षिणेतील चित्रपट केवळ दक्षिणेतच नाही, अन्य प्रांत वा देशातही चालतात. पण खुद्द महाराष्ट्रातच मराठी सिनेमा पहायला मराठी माणूस जात नाही. यावरून मराठी माणसांना मराठीचा किती अभिमान आहे, हे दिसून येते. दक्षिणेतील लोकांना त्यांच्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे. म्हणून तेथे केवळ त्यांच्या भाषेतील चित्रपट चालतात. तेथे हिंदी सिनेमांनाही स्थान नाही. भोजपुरी सिनेमे दुबईतही चालतात. पण मराठी सिनेमा मुंबई, पुणे आणि कोल्हापूरच्या बाहेर कधी पडत नाही. केवळ मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही, अशी ओरड करण्यापेक्षा आपला सिनेमा किती दर्जेदार आहे, याचाही निर्मात्यांनी विचार केला पाहिजे. कोणतंही प्रॉडक्ट तेव्हाच विकल्या जाईल, जेव्हा त्याला दर्जा असेल. आज डझनवार मराठी सिनेमे निघतात. केवळ शासनाचे अनुदान मिळते म्हणून मराठी सिनेमांची निर्मिती करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु त्यातील किती सिनेमे चित्रपटगृहापर्यंत पोहचतात, हा देखील संशोधनाचा विषय आहे, असेही ते म्हणाले. मी ठरवूनच चित्रपटसृष्टीत आलो, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. जे.जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये प्रशिक्षण घेतले. तेथून नाट्यलेखनाची आवड निर्माण झाली. सुरूवातीला नाटकातही कामे केली. त्यानंतर एकांकिका लिहिल्या. चाळ कमिटी, जाहिरात, बाप बी बाप, दुकान कुणी मांडू नये, नार्इंटीन फोर्टी सेव्हन ते एके फोर्टी सेव्हन यासह विविध नाटकांचे लेखन केले. यातील अनेक नाटके गाजली. पुढे सिनेक्षेत्रात पाऊल टाकले. जब्बार पटेलांच्या ‘मुक्ता’ या सिनेमासाठी संवाद लेखन केले. त्यानंतर डोंबिवली फास्ट (संवाद), सातच्या आत घरात (संवाद), सनई चौघडे (संवाद), मी सिंधूताई सपकाळ (पटकथा संवाद), मी शिवाजी राजे भोसले बोलतोय.. (पटकथा संवाद) या चित्रपटांसाठी लेखनाचे काम केले. येत्या ११ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या ‘लई भारी’ या चित्रपटाचे संवाद लेखनही पवार यांनी केले आहे. हिंदीतही त्यांनी ज्युली, बिरूद या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे. मी सिंधूताई सपकाळ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
मराठी सिनेमांच्या अधोगतीला मराठी माणूसच जबाबदार
By admin | Updated: July 3, 2014 00:53 IST