सैयद मोबीन
नागपूर : आरटीपीसीआर टेस्टच्या रिपोर्टशिवाय विमान प्रवासाला विमानतळ प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळारून विनाप्रवास प्रवासी परतत आहे. विशेष म्हणजे, आरटीपीसीआर रिपोर्ट ४८ तासांच्या आतील असणे आवश्यक आहे. या अटीमुळे प्रवाशांना अडचणी येत आहे. कारण रिपोर्ट मिळण्याचा कालावधीही निश्चित नाही. काही प्रवासी विनारिपोर्ट विमानतळावर पोहोचत आहेत, तर काही प्रवाशांना रिपोर्ट मिळविण्यासाठी ४८ तासांपेक्षा जास्तीचा कालावधी लागतो आहे. त्यामुळे ते विमान प्रवासासाठी अपात्र ठरत आहेत. प्रवाशांना अडचणी जात असून, एअरलाइन्सलाही नुकसान सहन करावे लागते आहे.
विमान प्रवास कोरोनामुळे कमी झाला आहे. दररोज उड्डाणे रद्द होत आहे. अशात आरटीपीसीआर रिपोर्ट गरजेची असल्याने प्रवाशांची संख्या आणखी कमी होत आहे. शहरात आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट तत्काळ मिळत नाही. रिपोर्ट मिळण्यासाठी किमान दोन दिवस लागतात. त्यामुळे ४८ तासांची अट अनेक प्रवाशांना अपात्र ठरवित आहे.
- रॅपिड अँटिजन टेस्टची परवानगी द्यावी
मुंबई, दिल्ली नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मागणी केली की, विमानतळावर त्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्याची परवानगी द्यावी. आरटीपीसीआर रिपोर्ट मिळविण्यास ४८ तासांपेक्षा जास्त कालावधी लागत असल्याने विमानतळावरून विनाप्रवास परतावे लागते. याबाबतीत संबंधित विभागाने गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे.