नागपूर : राज्यातील महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले. पण या एक वर्षात भाजपने आपली आडमुठी भूमिका बदलली नाही. सरकार पाडण्यासाठी वेळोवेळी कट रचण्यात धन्यता मांडली. केंद्रीय यंत्रणाचा वापर राजकीय विरोधकांना दाबण्यासाठी करण्यात आला. मात्र, असे कितीही कट रचले तरी काँग्रेस खचणार नाही. उलट ताकदीने लढणार, असे मत अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव विदर्भ प्रभारी आशिष दुआ यांनी व्यक्त केले.
पदवीधर मतदारसंघ निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी दुआ नागपुरात आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत. पहिल्यांदाच भाजप विरोधात सांघिक शक्ती उभी करण्यात आली आहे. त्याचा नक्कीच फायदा होईल. कोरोनाच्या काळात राजकारण बाजूला ठेवून भाजप नेत्यांनी राज्य सरकारला मदत करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता हेतूपुरस्सर पीएम फंड मध्ये स्वत:चा निधी दिला. केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे कोट्यवधी रुपये दिले नाही. उलट सरकारला बदनाम करण्याचा व अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. सत्तेसाठी भाजप कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो, हे वर्षभरात पहायला मिळाले, अशी टीका त्यांनी केली.
युवक, शेतकरी, महिलांच्या उद्धारासाठी केंद्राकडे कुठलीही योजना नाही. केंद्र सरकारचे कृषी विरोधी कायदे शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारे आहे. वित्तमंत्र्यांनी कृषी पॅकेज जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. युवकांना रोजगार देण्याऐवजी बेरोजगारी वाढली. आता शिक्षित युवकांना भाजपच्या फसव्या धोरणांची जाणीव झाली आहे. त्यामुळे आता कितीही ‘व्हॅक्सीन टुरीझम’ केले तरी काहीच साध्य होणार नाही, असा चिमटाही दुआ यांनी काढला.